बोहरा गावाजवळ जिलेटिन ब्लास्टिंगमुळे भीतीचे वातावरण; नागरिकांचा प्रशासनाला इशारा
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील मौजे बोहरा येथे निम्मंतापी प्रकल्पांतर्गत पाडळसरे धरण ते अमळनेर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असताना गावाच्या अगदी जवळ जिलेटिन ब्लास्टिंग करून खणकाम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत होणाऱ्या स्फोटांमुळे गावातील मातीच्या घरांना तडे जात असून काही सिमेंट (RCC) घरे देखील धोक्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वीही ठराव करून प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी केला आहे.

गावाजवळ अशा प्रकारे जिलेटिन ब्लास्टिंग करणे हे सुरक्षा नियमांचे उल्लंघन असून संबंधित ठेकेदाराने घेतलेले स्फोटक परवाना, एनओसी व सुरक्षा परवानग्या तपासाव्यात, तसेच प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, तात्काळ ब्लास्टिंग बंद करून नुकसानग्रस्त घरांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा ग्रामस्थांना पुढील स्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मानवाधिकार आयोग तसेच न्यायालयीन लढा उभारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.