हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर हायवेवर रास्ता रोको..
शेती पंपांचा वीजपुरवठा दोन दिवसात चालु करण्याचे आश्वासन.
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे
सध्या शेतात पाणी असूनही विजेअभावी पिके करपून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधी असलेले इथले राज्यमंत्री गप्प असून वीज तोडणी मोहिमेला पाठिंबा देत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. जर अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दोन दिवसात वीज तोडणी मोहीम थांबवून शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत चालु केला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मंगळवारी दि.८ मार्च रोजी दिला.
इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा या मागणीसाठी मोठे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. इंदापूर तालुक्याच्या इतिहासातले हे रास्ता रोको आंदोलन ऐतिहासिक असे झाले. महामार्गांवरती दोन्ही बाजूला अनेक किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी विक्रमी संख्येने उपस्थित असलेला शेतकरी वर्ग चांगलाच आक्रमक झाला होता.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज तोडणीला इंदापूरचे निष्क्रिय लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. तालुक्यात गेल्या 7 वर्षात त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या हिताचे येथे एकही काम झालेले नाही. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ सुरु करावा, शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज द्यावी, मार्च- एप्रिल- मे महिन्यात वीज तोडणी करू नये, वीज बिले दुरुस्त करून द्यावीत व ती भरण्यासाठी शेतकऱ्यांना 4 हप्ते करून द्यावेत या आमच्या मागण्या आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या राज्य सरकारने 5 वर्षे सत्तेवर असताना शेतकऱ्यांची एकदाही वीज तोडली नाही. उलट सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे ठरवून प्रत्येकी तीन ते चार महिन्याला अडचणीतील शेतकऱ्यांना खिंडीत गाठून सक्तीने व अन्यायकारक पद्धतीने वीज बिलाची वसुली करीत आहे. शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय भाजप थांबवेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले की, शेती पंपाच्या वीज तोडणी मोहिमेमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आजच्या आंदोलनामुळे महाविकास आघाडी सरकारचे डोळे उघडतील.
महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी वीज तोडणी केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला. भाजपचे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने चांगले निर्णय घेत आहे असेही त्यांनी सांगितले. जिथं लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची ताकद हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात आहे, असे यावेळी पृथ्वीराज जाचक यांनी भाषणात सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप, तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार, विलासराव वाघमोडे, बाबासाहेब चवरे, मारुती वनवे, बाबामहाराज खारतोडे, अँड. कृष्णाजी यादव, मोहन दुधाळ आदी अनेक मान्यवरांनी भाषणात सरकारवर टीकास्त्र सोडले. या आंदोलनामध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार व इंदापूरचे राज्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तहसीलदार श्रीकांत पाटील व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. आभार शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.
देवेंद्र फडणवीस यांचा आंदोलकांशी संवाद!
या आंदोलनामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे अधिवेशन चालू असताना मोबाईलच्या माध्यमातून आंदोलकांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारची सावकारी पद्धतीची वीज वसुली मोहीम शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचे टीकास्त्र सोडले. वीजप्रश्नी आम्ही सभागृहामध्ये सरकारला घेरले असून, भाजप शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.