कर्जत तालुक्यातील खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची शिफारस
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील ५ खत विक्रेत्यांच्या ऑनलाईन नोंदी व प्रत्यक्ष साठा यात मोठी तफावत आढळल्याने त्यांचे खत परवाने निलंबित करण्याची शिफारस करण्यात येणार आहे. कर्जत तालुक्यातील कृषी सेवा केंद्र तपासणी सुरु असताना हा प्रकार आढळून आल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे ही शिफारस करण्यात येणार आहे.
काही खत विक्रेत्यांनी प्रत्यक्ष खत विक्री करुनही ई-पॉसमधील साठा कमी केला नसल्याने त्यांनी ऑफलाईन विक्री केल्याचे उघड होत आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत ई-पॉस धारक खत विक्रेत्यांची तपासणी मोहीम राबवावी असे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी दिले होते.
कर्जतचे तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने कर्जत शहर येथील ६ व मिरजगावमधील ६ खत विक्रेत्यांच्या साठ्याची तपासणी केली. यामध्ये पाच खत विक्री केंद्रावर अनियमितता आढळून आली. यामध्ये दर्शनी भागात भावफलक लावलेला नसणे, अनुदानित खताची विक्री आधार लिंक करून केलेली नसणे, शेतकऱ्यांना बिले न देणे, साठा पुस्तकात अद्ययावत नोंदी नसणे, अनुदानित खत साठा व दुकानातील प्रत्यक्ष साठा यात गंभीर तफावत अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के व पंचायत समितीतील कृषी अधिकारी यांच्या पथकाकडून ही तपासणी मोहीम राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्याला आवश्यक असलेल्या खताची खरेदी करण्यापुर्वी पिकाची अवस्था, माती तपासणी अहवाल याची पडताळणी करावी. मृदा सुपिकता निर्देशांक, कृषक ॲप्लिकेशन यांचा वापर करून संतुलीत खताचाच डोस द्यावा. अनुदानित खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत घेऊन जावे आणि आधार लिंक केल्याशिवाय खत खरेदी करु नये. खत खरेदी केल्याचे बिल मागून घ्यावे असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना केले आहे.