शिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस .पी .डी . एम . कला, वाणिज्य , विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विभागप्रमुख प्राध्यापिका डॉ .रजनी नकुल लुंगसे या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या . महाविद्यालयीन सेवेत येण्यापूर्वी त्यांनी प्राथमिक व पूर्व प्राथमिक अशा स्तरापासून आपल्या अध्यापनाला प्रारंभ केला .माहेरी तशी शिक्षणाची फार मोठी परंपरा नव्हती . महिला शिक्षणाला पारंपरिक कुटुंबात फारसे महत्त्व दिले जात नव्हते .अशा काहीशा प्रतिकूल आणि विपरीत परिस्थितीत डॉक्टर रजनी लुंगसे मॅडम यांनी डीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . नंतरच्या काळात लग्न होऊन सासरी शिरपूरला आल्यानंतर त्यांनी प्रारंभी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या म .फुले हायस्कूल मध्ये प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले .

दुसऱ्या बाजूला त्यांना उच्च शिक्षणाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती .त्यातून त्यांनी नंतरच्या काळात या बीए , एमए या पदव्या मिळवल्या .संसार ,नोकरी आणि शिक्षण अशा तीनही स्तरावर त्यांचा संघर्ष दीर्घ काळ सुरू होता . सासरी एकत्र कुटुंबात अनेक वर्ष त्या रमलेल्या होत्या . एकत्र कुटुंबामध्ये नातीगोती, पाहुणेरावळे या अशा अनेक गोष्टी असतात . सासरी जाणाऱ्या मुली, त्यांची बाळंतपणं, व्याही , अतिथींचे आदरातिथ्य अशा सगळ्या व्यापातही त्यांनी उच्च शिक्षण घेतले .चांगले गुण मिळवले .पुणे विद्यापीठातून एम ए मराठी ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर आता त्यांना प्राध्यापिका होण्याचे आणि उच्च शिक्षणात प्रवेश करण्याचे वेध लागले . कर्मवीर अण्णा बाबा यांचा महिला शिक्षणासंदर्भात खूप आग्रह होता .पुढे आपल्या एसपीडीएम महाविद्यालयात मराठी विषयाची प्राध्यापकाची जागा रिक्त झाल्यानंतर त्यांना अण्णा बाबांनी प्राध्यापिका म्हणून संधी दिली .या संधीचे त्यांनी सोने केले .प्राध्यापिका म्हणून अध्यापन करीत असतानाच त्यांनी इरावती कर्वे यांच्या साहित्यावर एम .फील ही पदवी मिळवली आणि पुढे संत गाडगे बाबांच्या विचार आणि कार्यावर संशोधन करून पीएच .डी .ही सर्वोच्च पदवी देखील मिळवली .आणि अगदी शेवटी प्रोफेसर पदापर्यंत त्यांनी मजल मारली .या काळात त्यांनी शेकडो विद्यार्थी घडवले . मराठी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना बोलते केले . त्यांचा न्यूनगंड दूर केला . मराठी विभाग त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयांमध्ये सर्वोत्कृष्ट असा विभाग बनला

. उत्तम निकाल ,सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी, विविध उपक्रम यामुळे मराठी विभाग नावारूपास आला . ग्रंथालयातील मराठी विषयक ग्रंथांची संख्या प्रचंड वाढली . नियतकालिकांची संख्या प्रचंड वाढली . अध्यापना व्यतिरिक्त डॉक्टर लुंगसे मॅडम यांना समाजसेवेची, अध्यात्माची प्रचंड आवड होती आणि आहे . त्यांनी काही विद्यार्थिनींचे मोडू पाहणारे संसार सल्ला देऊन, उपदेश करून ते संसार पुन्हा मार्गी लावले . संभाव्य घटस्फोट थांबवले .एक दोन विद्यार्थिनी तर आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचल्याहोत्या . त्यांचेही मत परिवर्तन लुंगसे मॅडम यांनी केले . समाजामध्ये कुठलेही सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम असोत त्या सर्व कार्यक्रमात त्यांचा सहभाग अगदी उत्साहाने नेहमी असतो . विविध अशा सांस्कृतिक संस्थांवर त्या पदाधिकारी आहेत . मग अंकुर साहित्य संघ असो खानदेश साहित्य संघ असो उत्तर महाराष्ट्र मराठी प्राध्यापक संघ असो प्राध्यापक संघटना असो अशा विविध साहित्यिक , सांस्कृतिक , शैक्षणिक संस्थांवर त्या पदाधिकारी आहेत . यासोबतच त्यांनी संत गाडगेबाबांवर लिहिलेले पुस्तक, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यां साठी लिहिलेलं पुस्तक ,झोका हा स्त्रीवादी जाणिवेचा कवितासंग्रह अशी ग्रंथसंपदा देखील त्यांच्या नावावर आहे .यासोबतच त्यांनी विविध परिषदांसाठी लिहिलेले शोधनिबंध आहेत .त्यांची संख्या विपुल आहे .सामाजिक कार्यामध्ये मग महिला दक्षता समिती असो गर्भपात विरोधी चळवळ असो महिला मुक्तीची चळवळ असो दारूबंदीची चळवळ असो अशा विविध समाजोपयोगी चळवळीत आणि कार्यात त्यांचा सातत्याने हिरीरीने सहभाग राहिला आहे .

कर्मवीर अण्णा बाबा यांच्या जीवन व कार्यावर त्यांनी लिहिलेले स्वयंप्रकाशी हे पुस्तक फार महत्त्वाचे आहे .विविध दिवाळी अंकांतून त्यांनी लेखन केले .काही स्पर्धांतून त्यांनी बक्षिसे मिळवली . विविध नामांकित अशा पुरस्कारांनी देखील त्यांना गौरविण्यात आलेले आहे .एक कृतार्थ जीवन म्हणून त्यांचे प्राध्यापकीय जीवन राहिले आहे . यापुढेही त्यांच्याकडून अशीच समाज सेवा घडो ,अध्यापन सेवा घडो , सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखासमाधानाचे जावो अशी मनःपूर्वक शुभेच्छा