June 28, 2025 9:29 pm

निष्ठावंतांची कदर करा : आयारामांना कवटाळून पक्ष वाढणार नाही !

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिना निमित्त विशेष लेख
निष्ठावंतांची कदर करा : आयारामांना कवटाळून पक्ष वाढणार नाही !
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी नारळ वाढवून शिवसेनेचे नामकरण करून १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली होती. या ऐतिहासिक घटनेस उद्या ५९ वर्षे होतील. गेल्या ५९ वर्षात शिवसेनेच्या पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मूळची शिवसेना नाममात्र शिल्लक आहे. पूर्वी ती कॅडरबेस होती. मात्र १९९५ साली सत्तेची चटक लागल्याने ती लीडरबेस झाली आहे. शिव सैनिक हा कढी पत्त्याप्रमाणे वापरला जात आहे. निष्ठावंत हे पालखीचे भोई असतात व संधी साधू हे पालखीत बसून मिरवतात. सत्तेसाठी इतर पक्षातून ऐनवेळी आलेले आयाराम नेते म्हणून मिरवतात व निष्ठावंत झेंडे,पताका, प्रचार, सभेतील गर्दीसाठी व निवडणूकीच्या कामासाठी वापरले जातात. असे अनेक लोक ज्यांनी सत्ता उपभोगली व अमाप संपत्ती कमवली ते गद्दार झाले मात्र ज्यांची झोळी कायम रिकामी राहिली ते निष्ठेचा टिळा लावून ठामपणे पक्षाच्या पाठीशी उभे आहेत. अशा वेळी गद्दारी केलेल्यांना पुन्हा प्रवेश देऊन प्रतिष्ठा मिळालेली पाहून निष्ठावंतांचे मन उद्विग्न होते.
सद्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अतिशय बिकट व विचित्र पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे. असंख्य निष्ठावंत शिवसैनिक देखील कार्य पद्धतीवर नाराज आहेत, तरी ते अन्याय व अवहेलना सहन करीत निष्ठेने कार्यरत आहेत.हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम व निष्ठा यामुळेच तत्कालीन शिवसैनिक ही अवहेलना व प्रतारणा सहन करीत आहेत. उपरे व आयात केलेले त्यांच्या उरावर बसवले जात आहेत.
बाळासाहेबांना दिलेल्या शब्दाला जागून निष्ठावंत शिवसैनिक तग धरून आहे. कट्टर शिवसैनिकांची पिढी अस्तंगत होत चालली आहे. त्यामुळे खरे निष्ठावंत देखील लोप पावत चालले आहेत. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे अनुक्रमे बाळासाहेबांचे सुपुत्र व नातु म्हणून त्यांचे नेतृत्व अशा शिव सैनिकांनी स्विकारले आहे. पक्ष निष्ठेपेक्षा नेतानिष्ठेला महत्व प्राप्त झाले आहे. कधी कधी तर नेतेच पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजतात त्यामुळेच नारायण राणे-कोकण, गणेश नाईक -नवी मुंबई, छगन भुजबळ -नाशिक व एकनाथ शिंदे- ठाणे यांचे प्रस्थ वाढून ते स्वार्थासाठी पक्षद्रोह करतात तसेच आपल्या सोबत नेतेनिष्ठ सैनिकही घेऊन जातात. त्यांना आपण अमर्याद सत्ता व अधिकार दिले व विशिष्ट विभागांची सुभेदारी दिली की असेच गद्दार निर्माण होणार! यात त्यांच्या इतकाच पक्षाचाही दोष असतो, हे लक्षात आले पाहिजे.
सद्या जे पक्षात येत आहेत वा टिकून आहेत त्यातील बहुतांश फक्त पदं आहेत व तिकिट मिळावे यासाठीच आहेत.कट्टर शिवसैनिक अडगळीत टाकले जात आहेत. ही परिस्थिती बदलली नाही तर विरोधक म्हणतात तशी” शिल्लक सेना” ठरणार आहे. मी गेल्या तीन वर्षात जे जहाल व घणाघाती लेखन केले ते जीवाची जोखीम घेऊनच.कारण एकनाथ शिंदेंच्या बाले किल्यात राहून त्यांना उघड आव्हान देणे महाकठीण काम होते. मी आमिषांना व कोणत्याही भीतीस बळी न पडता ते काम निष्ठेने केले.परंतू माझी कदर गेली नाही. म्हणण्याला किंमत दिली गेली नाही.साधी भेट मागितली तर ती ही टाळली गेली. भेट मिळाली नाही.
बाळासाहेबांच्या व दिघे साहेबांच्या काळात सामान्य शिवसैनिकांना जो मान सन्मान होता, त्याचा लवलेशही सद्या उरलेला नाही. बाळासाहेब शिवसैनिकांना आपली कवचकुंडले मानीत आता शिवसैनिक मतदानात प्रचारापुरतेच वापरून फेकून दिले जातात.इथे किंमत आहे पैसेवाले धनाढ्य लोक व महागड्या कारवाल्यांना. हे किती दिवस चालणार ? “ज्यांना जायचे त्यांनी जावे मी अडवणार नाही,” हे धोरण बेरजेचे कि आतबट्याचे ? आजवर जे गेले ते काही सर्वच गद्दार नव्हते. पक्षाकडून झालेले दुर्लक्ष, संकटात एकाकी पाडणे, अपमानास्पद वागणूक, वेळेवर भेट न मिळणे यासारखी अनेक कारणे आहेत.”उद्धव साहेबांभोवतीचे “बडवे” हेच या दुरावस्थेला कारणीभूत आहेत.” आर्थिक गैरव्यवहाराचे जाहिर आरोप होऊनही या नेत्यांना दूर ठेवले जात नाही.त्यामुळे ही गळती लागली आहे.
लाखो टन पाण्याची टाकीही काही कालावधीत गळतीमुळे रिकामी होते. आजवर किती तरी निष्ठावंत याच कारणांमुळे गेले. अनेक जण उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. एकट्या विनायक राऊतांमुळे ठाणे व कोंकण रिकामा झाला. ज्यांना जायचे त्यांनी जावे,आम्ही उरलेल्यांबरोबर पक्ष चालवू असे म्हणणे आत्मघातकी आहे. या उलट बाळासाहेब म्हणत – “पाखरांनो परत फिरा रे !”
रावणाचा पराभव झाला व राम जिंकले त्याचे मुख्य कारण रावणाचा भाऊ रामांबरोबर होता व रावणाची गुपितं तो रामाला सांगत होता म्हणून बलाढ्य व शक्तिशाली रावण पराभूत झाला, या पासून आपण काही बोध घेणार की जे जातात त्यांना जाऊ दे ! असे म्हणणार ?
कट्टर शिवसैनिक जे “शिवसेनेचा मुख्यमंत्री होईपर्यंत चप्पल घालणार नाही !” म्हणत सात वर्षे अनवाणी फिरतात त्यांना शिवसेना सोडावी लागते ! कृष्णा देसाई प्रकरणी जन्मठेप भोगलेले विश्वनाथ खटाटे (बुवा) तसेच राजन साळवी सारखे कोकणातील कट्टर शिवसेना नेते निव्वळ विनायक राऊतांच्या कपटनीतिला कंटाळून पक्ष त्यागाच्या निर्णयाप्रत जातात तरी आम्ही म्हणणार “जे जातात ते जाऊ देत आम्हाला फरक पडत नाही ?” याच्याने पक्ष वाढ खुंटेल; कारण जी बांडगुळं तिकिट व पदाच्या लालसेने आपल्या पक्षात सद्या आहेत ते स्थलांतरित पक्षी आहेत.सुगीचे वा स्वार्थाचे दिवस संपले की ते उडून जातील. आज जी शिवसेना शिल्लक आहे ती बाळासाहेब ठाकरेंवरील निष्ठेमुळेच. ! ही पिढी संपली की असे निष्ठावंत शोधूनही सापडणार नाहीत. आत्ता उद्धव व राज ठाकरे बंधूनी वैयक्तिक इगो व हेवेदावे बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी व मराठी माणसांसाठी एकत्र येणे अत्यावश्यक आहे. अटी- शर्ती च्या जंजाळत न अडकता एकजूट दाखवून ठाकरे ब्रँड शाबूत ठेवून महाराष्ट्राला वाचवावे. तसे झाले नाही तर भावी पिढी त्यांना कधीच माफ करणार नाही.
मी हे मनानर दगड ठेऊन लिहित आहे कारण संयमाचा कडेलोट झाला आहे. हे लिहिण्याचे धाडस कट्टर शिवसैनिकच करू शकतो.काठावरील लोकांना शिवसेना तरली काय आणि बुडाली काय काहीही फरक पडत नाही. परंतू बाळासाहेब व दिघे साहेबांना आदर्श मानणाऱ्या शिव सैनिकांना निश्चितच दुःखद यातना होतात.अजून ब-याच बाबी लिहिता येतील परंतू झाकली मुठ सव्वा लाखाची अशी मनाची समजूत घालत येथेच थांबत आहे.
५९ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत शिव सैनिक व माझ्या वाचकांना मनापासून शुभेच्छा!
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
उल्हासनगर
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!