अमळनेर शहरातील अंबऋषी महाराज टेकडीवर आग; राजकीय दुर्लक्षामुळे नागरिकांत नाराजी
अमळनेर : विक्की जाधव.
काही दिवसांपूर्वी अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध अंबऋषी महाराज टेकडीवर समाजकंटकांनी आग लावल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत सुमारे ४५ हजार झाडे भस्मसात झाली असून, स्थानिक पर्यावरणीय समतोलावर मोठा परिणाम झाला आहे.
घटनेनंतर तात्काळ स्थानीय सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमींनी आग विझवण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले. टेकडी ग्रुपच्या पुढाकाराने अनेक स्वयंसेवकांनी मदतीसाठी धाव घेतली, आणि अखेर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
तथापि, अमळनेर शहरातील एकाही राजकीय व्यक्तीने या घटनेची दखल ही घेतली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. यात सत्ताधारी आणि महाराष्ट्र शसनाचे कृषिभूषण पुरस्कार प्राप्त कृषीभूषण साहेबराव पाटील देखील आहेत. त्यांनाही पर्यावरण-भूषणाची जाण नसावी?? अपेक्षित मदत आणि सहकार्य न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि असंतोष व्यक्त होत आहे. “पर्यावरणीय सुरक्षेबाबत स्थानिक नेतृत्वाने संवेदनशीलता दाखवावी,” अशी भावना टेकडी ग्रुपचे नरेश कांबळे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवत मोठे योगदान दिले.
टेकडीवरील झाडांना पाण्याची गरज लक्षात घेता, अमेय मुंदडा यांनी दररोज १० टँकर पाण्याची विनामूल्य व्यवस्था केली.
मुंदडा बिल्डर्सप्रमाणेच, संदीप थोरात, दिलीप सोनवणे, चंद्रकांत भदाणे, गोकुळ पाटील, विनोद जाधव, उमेश साळुंखे, पराग पाटील, आप्पा उपासनी, राहुल पाटील, किशोर बारी, प्रमोद पाटील, प्रकाश वाघ, जितेंद्र व राजेंद्र देशमुख, रेणुका स्टाईल अशा अनेक नागरिकांनी पुढे येऊन झाडांना पाणी पुरवठा व पर्यावरण वाचवण्याचे कार्य सुरू केले आहे.
शहरवासीयांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचे योगदान द्यावे, अशी एकात्म भावना निर्माण होत आहे. यामुळे भविष्यात अशा घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल.