बाळ ठाकरे पंचाक्षरी मंत्र !
बाळ ठाकरे या पंचाक्षरी मंत्राने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदूस्तानला पाच दशके व्यापून टाकले होते.शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे हे नावच इतके प्रभावी आहे की, कोणीही त्यापुढे नतमस्तक व्हावे.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांनंतर हिंदुत्वाचा उघड पुरस्कार कोणी केला असेल तर ते म्हणजे हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच.बाळासाहेब हे खरेच एखाद्या सम्राटा सारखे वागले आणि अखेरपर्यंत जगले सुद्धा ! महाराष्ट्राची आराध्य दैवते म्हणून भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज हीच होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने हिंदूत्ववादी जनतेत त्यांनी दैवता इतके स्थान प्राप्त केले; ते त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी,अढळ निष्ठेने व असिम त्यागामुळे “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलं !” असे संत वचन आहे. राजकारणात राहूनही हे वचन तंतोतंत पाळणे ही अशक्यप्राय बाब, परंतू बाळासाहेब शब्दाचे पक्के होते.एकदा एक वाक्य उच्चारले की,त्यावर ते ठाम असत.मग ते कोणत्याही परिणामांची तमा बाळगत नसत.
त्यांनी ओठावर एक आणि पोटात एक असा राजकिय दुटप्पीपणा कधीही केला नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करताना मतांचे राजकारण केले नाही. किंवा राजकीय नफा नुकसानीचे गणित मांडले नाही. मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी परप्रांतियांशी पंगा घेऊन मराठी माणसांची अस्मिता जपली,जोपासली व वृद्धिंगत केली.
पाकधार्जिणे मुस्लिम असोत की लाल बावटेवाले कम्युनिस्ट असोत की ढोंगी राजकारणी असोत, त्यांच्या बद्दल बाळासाहेब जी भूमिका घेत त्याबाबत ते ठाम असत.म्हणूनच ते निश्चयाचे महामेरू होते. महाराष्ट्रातील भूमिपुत्र मराठी माणसांवरील अन्याया विरोधात रणशिंग फुंकून ते ” बहुतजनांसी आधारू” झाले. या लोकशाहीतही शिवशाहीस आदर्श मानून शिवशाहीचा ध्यास घेऊन त्यांनी अल्पकाळासाठी का होईना,ती प्रत्यक्षात आणली.म्हणूनच ते आधुनिक “जाणता राजा” होते.
मी माझ्या वयाच्या १७ व्या वर्षापासून बाळासाहेबांना पाहत/ऐकत आलो आहे. दसरा मेळावा ही तर आम्हा शिवसैनिकां
साठी बाळासाहेबांचे ज्वलंत विचारांचे सोने लुटण्याची पर्वणीच असे.त्यांच्या विचारांचे सोनं लुटत लाखो तरूण रिचार्ज होऊन कार्यरत होत.महाराष्ट्रावर भगवा ध्वज डौलाने फडकत ठेवणारे महापुरुष म्हणजेच बाळासाहेब ठाकरे ! बाळा
साहेबांची दसरा मेळाव्यातील भाषणे ऐकण्यासाठी मी दरवर्षी हमखास शिवतीर्थावर जात असे. एका वर्षी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे भाषण सुरू होताच, धो धो पाऊस सुरू झाला होता.
तरीही जमिनीवर मांडी घालून बसलेले शिवसैनिक जागचे हालले नाहीत. वरून धो धो पाऊस पडतोय व व्यासपीठावरून बाळासाहेब शब्दांचे अंगार फुलवत होते. भर पावसात चिखलात बसून शिवसैनिक बाळासाहेबांचे विचार कानात प्राण साठवून ऐकत होते. त्यात मी ही होतो. असा अलौकिक नेता माझ्या तरी पाहण्यात नाही.
त्यांची ठाकरी भाषा, रोखठोक विचारसरणी मी काही प्रमाणात अंगिकारली आहे.त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव माझ्यावर आहे.अनेक प्रसंगी मी अपप्रवृत्तीशी वैर पत्करतो,कटू सत्य निर्भीडपणे मांडतो,त्यासाठी कोणाच्याही राग लोभाची पर्वा करीत नाही, हेच बाळासाहेब यांचे माझ्यावर झालेले संस्कार आहेत. काल परवा मी लिहिलेला- बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे ? हा लेख त्याच पठडितला आहे.
बाळासाहेब हे प्रथम जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार होते.त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा लाभला होता.मार्मिक या साप्ताहिकातून वाचा आणि गप्प बसा ! या सदरातून त्यांनी मरगळलेल्या मराठी मनांवर फुंकर घालून चैतन्य निर्माण केले. त्यातूनच १९ जून १९६६ रोजी शिवसेना ही मराठी माणसांच्या संघटनेचा जन्म झाला. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्क च्या मैदानावर मार्मिककार व नांमवंत व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांची पहिली सभा “न भूतो” अशी झाली. प्रस्थापित राजकारणी व प्रसिद्ध माध्यमांचे डोळे दिपवून टाकणारी ही पहिली जाहिर सभा झाली. दोन लाखांहून अधिक जनसागर उसळला होता. लोक आश्चर्याने चकित झाले होते. असा मेळावा या पुर्वी कधीच झाला नव्हता. शिवाजी पार्क माणसांनी फुलून गेला होता.बाळ ठाकरे या व्यक्तिस पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखो माणसं आतुरली होती.या प्रसंगी बाळासाहेबांनी तासभर केलेले भाषण मंत्रमुग्ध करणारे होते.
१९७९ सालची घटना आहे. बाळासाहेब खूप आजारी होते.सर्व शिवसैनिक चिंतित होते. मातोश्रीवर रिघ वाढत चालली होती. त्याही अवस्थेत बाळासाहेब बाहेर डोकावले व त्यांनी हात हलवून शिवसैनिकांना अभिवादन केले.नंतर त्यांनी मार्मिक मध्ये- “आम्ही बरे आहोत !”
हा लेख लिहून शिवसैनिकांना दिलासा दिला. या लेखात बाळासाहेबांनी शिवसैनिकांबद्दल जे प्रेम व्यक्त केले व आत्मियता दाखवली ती शब्दातीत होती. इतके निखळ प्रेम नेत्यांत व कार्यकर्त्यांत पाहायला मिळने दुर्मिळ बाब आहे.
नेमक्या त्याच मार्मिकच्या अंकात (१९७९) माझा एक दीर्घ लेख प्रकाशित झाला होता.त्यामुळे माझा लेखही घरोघरी वाचला गेला होता.सदर अंक आजही माझ्या संग्रही आहे.
१९६६ च्या सभेतील बाळासाहेबांचे शब्द आजही आठवतात.”लोकशाहीने प्रश्न सुटणार नसतील तर ठोकशाही स्विकारणे भाग पडेल.आम्हाला सर्वत्र मराठीच पाहिजेत. येथील गुंड ही मराठीच हवेत. हातभट्टीवालाही मराठीच असला पाहिजे.” याच सभेत प्रबोधनकार ठाकरे कडाडले होते-“झगडल्याशिवाय काही मिळत नाही.सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्यात.” तमाम मराठी माणूस एकवटल्याचा त्यांनी आनंद व्यक्त करून “माझा बाळ मी महाराष्ट्राला दिला” अशी घोषणा केली होती.
बाळासाहेबांचे विचार हे शिवधनुष्य आहे .ते आचरणात आणणे हे ये-या गबाळ्याचे काम नाही. दिल्लीच्या सत्ताधिशांनाही मातोश्री शिवाय पर्याय नसे. दुसरे बाळासाहेब होणे नाही.त्यांच्या सारखा परखडपणा,त्यांच्या सारखे डॅशिंग नेतृत्व, अजातशत्रूत्वाची हाव नसलेले,
आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे नेतृत्व, शिवसैनिकांवर पुत्रवत प्रेम करून त्यांचा आदर राखण्याचा स्वभाव, करडी शिस्त,संघटन शक्ति आज कोणातही नाही.असे अमोघ नेतृत्व आपल्याला लाभले हेच आपले अहोभाग्य !
या महापुरुषाचा परिसस्पर्श मला झाला,त्यामुळे त्यांच्यातले काही गुण ( निर्भीडपणा, परखड लेखन शैली ) काही अंशी माझ्यात उतरले आहेत.ते जसे मृत्यूला कधीही घाबरले नाहीत तसा मी ही कधीच मृत्यूला घाबरलो नाही.राग लोभाची पर्वा केली नाही. त्यामुळे बाळासाहेब हेच माझे आदर्श नेते आहेत. त्यांच्या शतकपूर्तीस एकच वर्ष शिल्लक आहे.त्यांच्या ९९ व्या जयंती दिनी विनम्र अभिवादन करून या लेखाला अल्पविराम देतो.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक
९८२२९०२४७०