अब उंट आया पहाड के निचे !
अब आया उंट पहाड के नीचे ! या म्हणीचा प्रत्यय नुकताच आला आहे. प्रथम मुख्यंमंत्री पदासाठी स्री हट्टाप्रमाणे हट्ट करणारे मा मु ( मावळते मुख्यमंत्री ) एकनाथ शिंदे यांना दिल्लीच्या आलाकमान मोदी शहांनी यांना विन्मुख करून परत पाठवले. अडिच वर्षांपुर्वी अवघे ४० आमदार असताना मुख्यमंत्री पदावर नियुक्ति केल्याच्या उपकारांची आठवण करून देत डोळे वटारताच मामुंनी आपल्या अनाठायी हट्टाला बासनात गुंडाळले. मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या मामुंना त्याची चटक लागली होती, ते पद सोडताना जीवावर येत होते,परंतू काळाने सूड उगवलाच. ज्यांनी दगाबाजी करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला भाग पाडले, त्यांनाच भाजपाने मुख्यमंत्री पद नाकारून मामु होण्यास भाग पाडले.
मुख्यमंत्री पद मिळत नाही, याचा शारिरिक, मानसिक व राजकिय ताप आल्याने मामु आपल्या गावी गेले. तिथे एकांतवासात त्यांना १०५ डिग्री ताप आला. घश्याला प्रादुर्भाव झाला. या किरकोळ आजारासाठी पुर्वी आजीबाईचा बटवा पुरेसा असे. परंतू मुख्यमंत्र्यांना त्यांच्या गावात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध न झाल्याने मुंबईहून खास वैद्यकिय पथक आयात केले.
दोन दिवसात हा ताप उतरला तरी उपमुख्यमंत्री पदास मन राजी होईना ! मग उपमुख्यमंत्री पद स्विकारले तर मला गृहमंत्री पद हवे ! असा बालहटट्ट सदृश्य अट्टाहास केला. भाजपा हा कपटी पक्ष आहे. एकदा उपयोग संपला की फेकून देण्याची वृत्ती असलेला पक्ष. मामुंना ते थारा देईनात, बार्गेनिंग पॉवर संपवण्यासाठी अजित पवारांनी भाजपाला बिनशर्ट पाठींबा तोही कोणतेही आढेवेढे न घेता देऊन टाकला. पाच अपक्ष जमेस धरून १३२+४१+ ५ असे १७८ चे संख्याबळ झाल्याने शिंदेच्या पाठींब्या शिवाय बहुमताचे सरकार येऊ शकते, हा संदेश मामुंना दिला.
आपले काहीच चालणार नाही व सत्तेबाहेर राहिलो तर आपले आमदार सत्तेसाठी आपल्याला सोडून जातील, ही रास्त भीती मामुंना होतीच. जे उद्धव ठाकरें सोबत झाले ते शिंदेंबाबत होण्यास फारसा अवधी लागणार नाही, हा धोका होताच.शिवाय पुर्वीचे पराक्रम व अडिच वर्षातील महापराक्रमांचा लेखा जोखा भाजपाच्या चाणक्याने फाईलबंद करून तयारच ठेवला होता. आपण केलेले पाप इतक्या लवकर आपल्यावर बुमरॅन्ग होऊ नये, याची धास्ती होतीच. कोणताही अतिमहत्वाकांक्षी नेता ही रिस्क घेणार नाही.
अखेर उपमुख्यमंत्री पद न स्विकारता बाहेरून पाठींबा देणे हा आत्मघाती प्रकार
असल्याचे दरे गावातील आत्मचिंतनाने मामुंच्या लक्षात आले. मग संजय शिराट व दीपक केसरकर यांनी मामुंनी उपमुख्यमंत्री पद स्विकारावे ! असा सर्वांचा आग्रह असल्याचे प्रसिद्धी माध्यमांतून जाहिर केले. हा या हतबलतेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न होता. मग गृहमंत्री पदाचा हट्ट विनाकारण ताणून धरल्याचा आभास निर्माण करून प्रसिद्धीचा फोकस मामुंवर ठेवण्याचा प्रयत्न झाला.तब्येत वारंवार बिघडत होती व सुधरत होती, प्रसिद्धी माध्यमांना खाद्य व मामुंना नको तेवढी प्रसिद्धी मिळत गेली.
अखेर उंट पहाडाखाली उतरलातच! कारण निसरड्या पहाडावर उंट जास्त काळ तग धरू शकत नव्हता. आज संध्याकाळी मामुंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास संमती देऊन पहाडाखाली आलेच. गेले १३ दिवस फुकटची करमणूक म्हणा किंवा बिनपैश्याचा तमाशा महाराष्ट्राने पाहिला !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०