June 29, 2025 11:52 am

कल्याण पुर्व विधान सभा मतदार संघातील ओढवून घेतलेला पराभव !

अपनी भाषा में पढ़े! Translate

कल्याण पुर्व विधान सभा मतदार संघातील ओढवून घेतलेला पराभव !
(कल्याण पुर्वेच्या निकालाचे विश्लेषण )
कल्याण पुर्व हा विधानसभा मतदार संघ बहुचर्चित होता.येथील भाजपाचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील बेछूट गोळीबाराने चर्चेत आला होता. महेश गायकवाड हे शिंदे समर्थक असले तरी येथील उमेदवारी भाजपलाच मिळणार हे सुनिश्चित होते. त्यामुळे माझ्यावर गोळीबार केलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या कोणत्याही सदस्यास उमेदवारी दिली तर मी अपक्ष निवडणूक लढवणार ! अशी घोषणा महेश गायकवाड यांनी तिकिट वाटपाआधीच केली होती. परंतू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मतदार संघ प्रतिष्ठेचा केला होता व गणपत गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यावर ठाम होते.त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपा समोर हतबल झालेले असल्याने ते महेश गायकवाड या आपल्या सहकार्यास मदत करू शकले नाहीत.
आपल्या मनाविरोधातील व आपल्यावरील मारेक-याच्या पत्नीस उमेदवारी दिल्याने महेश गायकवाड यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. शिवसेनेच्या स्थानिक उपनेत्या मार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतू शिवसेनेचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनाच उमेदवारी देण्याचे सुनिश्चित असल्याने महेश गायकवाड यांचा पक्ष प्रवेश रोखला गेला. हे तेच महेश गायकवाड आहेत ज्यांनी धनंजय बोडारे यांनी गेल्यावेळी अपक्ष म्हणून या मतदार संघातून निवडणूक लढवली होती तेव्हा सर्वशक्तिनीशी प्रचार व मदत केल्याने बोडारे यांना कल्याण पुर्वेतून ४८ हजार मतं मिळाली होती. त्याच वेळी महेश गायकवाड यांनी आपले शक्तिप्रदर्शन केले होते.
महेश गायकवाड यांना पक्ष प्रवेश नाकारला तरी त्यांनी अपक्ष उमेदार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाची व विशेषत: देवाभाऊंची नाराजी ओढवू नये म्हणून महेश गायकवाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतू महेश गायकवाड हे आपल्या निर्धारावर ठाम राहिले.त्यामुळे भाजपची खप्पामर्जी टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्यासाठी जीवाची बाजी लावणा-या समर्थकाची पक्षातून हकालपट्टी करून टाकली.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे धनंजय बोडारे यांनी लोकसभा निवडणूकीपुर्वीच या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली होती.लोकसभा निवडणूकीत वैशाली देकरांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी हा मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला होता. त्यांच्या पाठीशी अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांचे पाठबळ होते.महेश गायकवाड यांचा पक्ष प्रवेश याच कारणाने टाळण्यात आला होता. या मतदार संघातून माजी महापौर रमेश जाधव व जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडेही इच्छूक होते. परंतू उमेदवारीचे दान धनंजय बोडारेंच्या पदरात पडले. त्यामुळे हर्षवर्धन पालांडे,रमेश जाधव व आशा रसाळ हे इच्छूक नाराज होते.त्यांची नाराजी दूर करण्याबाबत संपर्क नेत्यांनी हलगर्जीपणा दाखवल्याने हर्षवर्धन पालांडे यांनी मतदानाच्या दोन तीन दिवस आधी शिंदे गटाची वाट चोखाळली. रमेश जाधव व आशा रसाळ यांनी नाराजीमुळे प्रचारात भाग घेतला नाही. त्यामुळे भाजपा उमेदवाराचे बळ वाढले.
महेश गायकवाड हे जिंकण्याच्या इर्शेने प्रचार करत होते, प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवत होते. आगरी फॅक्टर व गोळीबारामुळे मिळालेली सहानूभुती या महेश गायकवाड यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. मतदानाच्या तीन दिवस आधी शिंदेंनी त्यांना आर्थिक रसदही पुरवली.त्यामुळे महेश गायकवाड यांचे हौसले बुलंद झाले व तेच बाजी ंारतील असे वातावरण तयार झाले.
शिवसेनेचे धनंजय बोडारे यांनी देखील आपल्या समर्थकांच्या सहकार्याने प्रचार यंत्रणा अतिशय प्रभावीपणे राबवली. उद्धव बाळासाहेब ठाकरे, सुषमा अंधारे व अनंत गीते-ज्योति ठाकरे यांच्या यशस्वी प्रचार सभांनी अनुकूल वातावरण निर्मिती केली होती. महेश गायकवाड, पावशे व सुलभा गायकवाड यांच्यात कल्याण पुर्वेतील व ग्रामिण भागात मतविभाजन होऊन बोडारे हे निवडून येतील असे मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत वाटत होते.मात्र एकनाथ शिंदे यांच्या “गनिमी कावा”ने महेश गायकवाड यांना बळ दिले.धनंजय बोडारे यांचे ज्येष्ठ बंधु शिंदे गटात असूनही धनंजय बोडारे यांना मदत करण्याऐवजी बोडारेंचे पंख छाटण्यासाठी महेश गायकवाडला बळ दिले.एकवेळ सुलभा गायकवाड आल्या तर उत्तमच परंतू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार विजयी होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.
अखेर निकालात सिद्ध झाले की भाजपाच्या सौ.सुलभा गायकवाड यांना ८१ हजार ५१२ मतं मिळाली तर महेश गायकवाड यांना ५५ हजार १६८ मतं मिळून त्यांनी दुस-या क्रमांकावर मजल मारली तर धनंजय बोडारे यांना गेल्या वेळच्या ४८ हजारांचा पल्लाही गाठता आला नाही. त्यांना तिस-या क्रमांकाची ३९ हजार ५१२ मतं मिळाली.त्यामुळे मत विभाजनाचा लाभ सुलभा गायकवाड यांना होऊन त्या २६ हजार ३४८ मतांनी विजयी झाल्या. यापुर्वीच्या तिन्ही निवडणूकीत ही गणपत गायकवाड यांना मतविभाजनाचा लाभ मिळाला होता.
जर का नेत्यांनी महेश गायकवाड यांचा पक्ष प्रवेश करून घेतला असता तर धनंजय बोडारे व महेश गायकवाड यांना मिळालेली अनुक्रमे ३९ हजार ५१२ व ५५ हजार १६८ मतं मिळून त्यांना ९४ हजार ६२० मतं मिळाली असती व सुलभा गायकवाड यांचा १३ हजार १०४ मतांनी पराभव करता आला असता. त्यामुळे धनंजय बोडारे यांच्या किंवा महेश गायकवाड यांच्या पराभवास जबाबदार कोण ? याचे आत्मपरिक्षण होऊन आत्ता तरी नाराजांची नाराजी दूर करणार की जैसे थे परिस्थिती ठेवणार ?
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!