सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी, निवडणुकीनंतर सोयाबीनला किमान आधारभूत किंमत मिळण्याची शक्यता..
विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देण्याची शक्यता असून महायुतीच्या सरकारनं पाच हजार रुपयांची मदत दिल्यानंतर आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचं उत्पादन अधिक होतं. विदर्भातील वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. या शेतकऱ्यांसाठी आधार म्हणून महायुती सरकारने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.
तसेच महाविकास आघाडी सत्तेत आली तर सोयाबीन खरेदी 7000 रुपये प्रति क्विंटल दराने करेल, अशी मोठी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी देखील केली आहे.सोयाबीनचे पडलेल्या दरामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा रोष सत्ताधाऱ्यांवर आहे. हेच लक्षात घेऊन मविआ सरकार सत्तेत आले तर सोयाबीनची खरेदी 7 हजार रुपये प्रति क्विंटलने करू, अशी घोषणा मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे.