काय धरू ? काय सोडू ??
धनंजय बोडारेंचे जिल्हाप्रमुख पद
औट घटकेचे ठरणार ?
नुकत्याच कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जिल्हा प्रमुख पदाचा अभिषेक करवून घेतलेल्या धनंजय बोडारे यांची अवस्था काय धरू ?आणि काय सोडू ?? अशी झाली आहे. दोन ढड्ढाचार्यांच्या मखलाशी नंतर लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवास भव्य दिव्य विजयाचा मुलामा लावून दोन लाखाने झालेला पराभव हे आमच्या मेहनतीचे फळ आहे. अन्यथा दरेकरांचा मोठ्या फरकाने पराभव झाला असता,असे म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेत जिल्हा प्रमुख पदाचे दान पदरात पाडून घेतले. शिवसेनेच्याच मुखपत्रात दै. सामना मधे लाखभराची रंगीत जाहिरात देऊन “उद्धव ठाकरे साहेबांचा कल्याण लोकसभेत सर्जिकल स्ट्राईक” म्हणून गुणगौरव करणारे जिल्हा प्रमुख, त्यांचे पाठीराखे स्वयंघोषित नेते व झारीतले दोन शुक्राचार्य यांनी आपली प्रसिद्धीची खाज भागवून घेतली.
शिवसेनेत जे काही पद असेल ते मिळणे हा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे, या मिजासात वावरणा-या बोडारे बंधुनी आजवर शिक्षण मंडळ सदस्य, जिल्हा प्रमुख, जिल्हा समन्वयक, विरोधी पक्ष नेते, उपमहापौर पद, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती,इतकंच नव्हेतर एसीओ पद मिळवले. ज्या चंद्रकांत बोडारेंनी “यांना कोणत्या अधिकारात बोलवायचे ? हे तर सर्वसामान्य शिवसैनिक आहेत !” असा माझा मातोश्रीवर उपमर्द केला तेच नंतर शिंदेवासी झाले. एक भाऊ जो जिल्हा प्रमुख होता तो शिंदेवासी झाल्यानंतर लोकसभा समन्वयक असलेल्या धनंजय बोडारेने आपल्या पदाचा राजिनामा देणे नैतिकतेस धरून होते. परंतू तसे न होता दोन्ही बंधु एकाच छताखाली मिंधे व ठाकरे गटाचे काम करीत होते.त्याचाच परिपाक म्हणून डॉ.श्रीकांत शिंदे यांना संपुर्ण कल्याण लोकसभा मतदार संघात प्रचंड आघाडी मिळाली व शिवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकरांना धोबीपछाड मिळाली. याचेच बक्षिस म्हणून धनंजय बोडारेंना कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जिल्हा प्रमुख पदाची मनसबदारी बहल करण्यात आली असावी.
धनंजय बोडारे यांना मिळालेले जिल्हा प्रमुख पद हे त्यांनाच आत्ता रिडकी हड्डी, (गळ्यात अडकलेले हाड) ठरणार आहे. कल्याण विधानसभा मतदार संघातून आमदारकी लढवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी दोन वेळा प्रयत्न केला, २०१९ ला तर त्यासाठी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली होती. कल्याण विधान सभेतून ठाकरे गटातूनच उमेदवारी मिळू शकते, या आशेवर ते तग धरून होते. कल्याण जिल्हा प्रमुख पद संपादन केले त्या जोरावर विधान सभेची उमेदवारीही मिळेल कारण दोन भक्कम पाठीराख्या नेत्यांचा मला पाठींबा आहे,असे त्यांना वाटत होते.
परंतू “कंबख्त” नशिबाने धोका दिला. आत्ता नवीन धोरणानुसार ज्यांना जिल्हा प्रमुख पद मिळाले आहे, त्यांना विधान सभेची उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे महत्प्रयासाने मिळवलेले कल्याण जिल्हा प्रमुख पद टिकवायचे की त्यावर तुळशी पत्र ठेऊन विधान सभेच्या उमेदवारीसाठी सेटींग लावायची ? हा यक्ष प्रश्न बोडारेंना भेडसावत आहे. कल्याण विधान सभेची उमेदवारी हवी असेल तर जिल्हा प्रमुख पदाचा राजिनामा द्यावा लागेल. गेल्या २ पराभवा नंतर पुन्हा तिस-यांदा उमेदवारी मिळेल याची खात्री ( गॅरंटी ) कोण देणार ? गेल्या निवडणूकीत मिळालेली मत ही एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे व मिंधे समर्थक नगरसेवकांमुळेच मिळाली होती. त्यावेळी बोडारेंच्या ९ प्रभागात ते पिछाडीवर होेते. यावेळी मिंधे महेश गायकवाड सारख्यास उमेदवारी देईल किंवा युती झाली तर भाजपला पाठींबा देईल. त्यामुळे कल्याण लोकसभा निवडणूकीतील कल्याण विधान सभेची पिछाडी पाहता बोडारे गेल्या वेळच्या मतांच्या जवळपासही जाऊ शकणार नाहीत. शिवाय कल्याण विधा सभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास हर्षवर्धन पालांडे व माजी महापौर रमेश जाधव हे स्थानिक उमेदवारही इच्छूक आहेत. त्यांना डावलून धनंजय बोडारेंना तिस-यांदा उमेदवारी मिळेल का ?
विधान सभा निवडणूकीसाठी कल्याण जिल्हा प्रमुख पदाचा राजिनामा दिल्यास धनंजय बोडारेंची स्थिती तेल गेले तुपही गेले व हाती धुपाटणे आले, अशी होणार आहे. नियतीच्या मनात काय आहे ? लवकरच दिसेल !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०