शेटफळ गडे येथे मागील काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ नागरिक झाले हैराण..
प्रतिनिधी:- प्रा तुषार वाबळे
इंदापूर तालुक्यातील मौजे शेटफळगडे या गावात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांना उधान आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. मागील काही दिवसातच शेटफळ गडे येथे दोन घरे फोडून चोरट्यानीं सोने तसेच रोख रकमेचे ऐवज लांमपास केले . ही घटना ताजी असतानाच आता तर चोरटे रोजच शेटफळ गडे या गावात चोरीचा प्रयत्न करत आपली दहशत पसरवत आहेत. यामुळे गावातील तसेच वाडीवस्त्यावर लोकांमध्ये रात्रभर जागरण करण्याची वेळ आली आहे. यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक घटकाने भीतीचा जनू धसकाच घेतला आहे. सदर परिस्थितीची माहिती घेऊन गावातील सरपंच तसेच ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा चालू करून घेतली आहे. त्यामुळे चोरीच्या घटनेची लगेच माहिती सर्व नागरिकांना पोहोचवण्यात यश प्राप्त झाले आहे. यामुळे सजगतेचा इशारा सर्व ग्रामस्थांना त्वरित मिळत आहे.परंतु एवढे असताना देखील नागरिकांमधील भीती काही कमी होत नाही.
चोरीच्या घटनांमुळे नागरिकच नव्हे तर पोलीस देखील हैराण झाले आहेत. रात्रभर पोलीस देखील गाडीमधून गावामध्ये गस्त घालत आहेत. तरी देखील चोर पकडण्यात त्यांना यश प्राप्त होत नाही. त्याबरोबरच मागील काही दिवसापासून शेटफळगडे तसेच अवतीभोवती असणाऱ्या परिसरात दिवसा आणि रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरताना दिसत आहे. याची देखील माहिती ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तसेच पोलिसांना दिली असता. याबद्दलची उकल अजून कुणाला झालेली नाही.यामुळे शेटफळगडे येथील नागरिकांची रोज लांडगा आला रे! आला! अशी गत झाली आहे. चोरीच्या या घटनांपासून शेटफळ गडे येथील नागरिकांना कधी सुटका मिळेल असा प्रश्न सर्व स्तरातून चर्चेत आला आहे.