करमाळा प्रतिनिधी :- माढा लोकसभेची रणधुमाळी विविध राजकीय आरोप प्रत्यारोपाने गाजत आहे. देशाचे नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेत भाजपा वर हल्लाबोल चढविला तर उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेत विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. दोन्ही नेते व त्यांचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी मोठ्या सभा, कॉर्नर बैठका घेत रणरणत्या उन्हात जीवाच्या आकांताने मतांची जुळवाजुळवी करण्यासाठी घणघण करीत आहे. तर दुसरीकडे मात्र करमाळयातील नागरिक अजूनही पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहे.
उजनी धरण करमाळा वासियांच्या उशाला असतानाही कोरड मात्र घशाला होताना दिसत आहे. उजनी धरणाच्या नियोजन शून्य कारभारामुळे उन्हाळयाची चाहूल लागण्या आगोदरच नागरिकाना पाणी टंचाई भासू लागली होती. आता ऐन उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसानी नागरिकाना पाणी मिळत आहे ते ही कमी दाबाने. त्यामुळे नेते जरी प्रचार यंत्रणेत मशगुल असले तरी सामन्यांचा वाली कोण ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
ज्या उजनी धरणाची निर्मिती देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे हट्ट करून वेळ प्रसंगी व्यापक आंदोलन उभारून करमाळ्यासह सोलापूर जिल्हा वासियांची तहान भागवण्यासाठी, शेतीची पिके जगून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केली होती. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 1517 गिगालिटर्स (GigaLitres) एवढी प्रचंड आहे.117 टि.एम.सी(100%) 123टि.एम.सी(111%) इतकी आहे.
मात्र आज त्याच धरणाची नियोजना अभावी झालेली वाताहत पाहवत नाही. ज्यांच्या हक्काचे पाणी आहे ते त्यांना मिळत नसून बारामती, जामखेड, इ. सह इतर जिल्हे व तालुक्यातील नेते मंडळी पाणी पळविण्यात यशस्वी होताना दिसत आहे तर जिल्हयातील स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी मात्र अवाक्षर ही काढताना दिसत नाहीत. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली तरी निवडणुका आल्यानंतर पाण्याचा मुद्दा घेऊन प्रचारात उतरावे लागत असल्याची मोठी शोकांतिका या निमित्ताने पाहायला मिळत आहे.