मदनवाडी:पाण्यासाठी दाही दिशा; ‘आधी पाणी द्या, मग मत मागा’ गावागावात पाणी प्रश्न पेटणार?
(गावात 17 पुढारी,पण एक पण नाही कामधारी)
(निलेश गायकवाड)
मदनवाडी:जसजसा उन्हाचा कडाका वाढतोय तसतसा पाण्याचा प्रश्न भीषण होऊ लागला आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. तर काहींना टँकरची वाट पाहात बसण्याशिवाय पर्याय नाही. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडी हे त्यापैकीच एक गाव.यागावात पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीच धूम सुरू आहे. गावावात नेते प्रचारासाठी जात आहेत. मत मागत आहे. हे पाहाता मदनवाडी गावच्या गावकऱ्यांनी आधी पाणी द्या मग मत मागा अशीच भूमिका घेतली आहे.
तब्बल दीड महिने झाले पाणी अजून देखील सुटले नाही. नागरिकांना वर्षानुवर्ष गावचा पाणी प्रश्न असाच प्रलंबित असल्यामुळे गावात 17 पुढारी असून देखील काही कामाचे नाहीत असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पुढारी फक्त गोड गोड बोलतात निवडणुका आल्या आपला स्वतःचा स्वार्थ साध्य झाला गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे त्यांचा विसर पडतो. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेतेमंडळी गावातील नागरिकांची दिशाभूल करतात. मदनवाडी गावातील सर्वाधिक पाणीटंचाई असणारा वार्ड म्हणजे दोन नंबर आणि तीन नंबर तसेच बाकीच्या वार्डात देखील कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागतच आहे. गावातील नागरिक म्हणजे आपल्या कुटुंबातील नागरिक अशी भावना ठेवून जर व्यक्तिगत पाहता सामाजिक जबाबदारीने जर नियोजनबद्ध काम पाहिले तर गावाच्या पाण्याचा प्रश्न कधीच मिटून जाईल.
पाणीटंचाईमुळे विकत पाणी घेण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. यापार्श्वभूमिवर जो उमेदवार मत मागण्यासाठी गावात येईल, त्यांना आधी पाणी द्या मग मत मागा अशीच मागणी गावकरी करणार आहेत. घराघरात मत मागता तसं घराघरात पाणी द्या अशी मदनवाडी गावातल्या गावकऱ्यांची मागणी आहे. जो पर्यंत पाणी नाही तोपर्यंत मतही नाही अशीच गावकऱ्यांनी भूमिका घेतली आहे.
टँकर सुरु करण्याची मागणी..
मदनवाडी गावासाठी टँकर सुरु करण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसत नाही.अशा वेळी गावकऱ्यांना नेत्यांकडून मोठी अपेक्षा आहे. तसेच निवडणुका असल्यानं आपला पाणी प्रश्न मार्गी लागेल असं त्यांना वाटत आहे. पाण्यासाठी सर्वसामान्य, गरीब कुटुंबाचे नुकसान होत असल्याचं गावकरी सांगत आहेत. पाणीटंचाई समोर नागरिक हत बल झाले आहेत याची तरी दखल घ्यावी असं गावकरी सांगत आहे.
नेते पाणी देणार की मत मागणार?
घरोघरी पाणी द्या मग मत माग ही गावकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता मत मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांच्या कोर्टात चेंडू आहे. त्यामुळे ते मत मागणार की आधी पाणी देणार हे महत्वाचं आहे. का नेहमी प्रमाणे आश्वासनाची बोळवण करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पाण्याची ही समस्या पाहात प्रशासनानंही लक्ष देणं गरजेचं आहे. अजून मे महिना सुरू व्हायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात ही पाण्याची स्थिती आणखी गंभीर होईल. त्यामुळे वेळीच उपाययोजना केल्या तर गावकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल.