June 29, 2025 6:19 am

पप्पु कलानींचे राजकिय भवितव्य पणाला लागणार !

अपनी भाषा में पढ़े! Translate

पप्पु कलानींचे राजकिय भवितव्य पणाला लागणार !
सुरेश उर्फ पप्पु कलानी यांच्या भोवती गेली ३७ वर्षे उल्हासनगरचे राजकारण फिरत आहे.पप्पु कलानी हा निव्वळ किंग नसून तो किंगमेकर आहे हे त्याने वारंवार सिद्ध केले आहे. कलानी गटात फुट पडली नसती तर पप्पु कलानीचे साम्राज्य आजही अबाधित राहिले असते. एकेकाळी भारतीय जनता पार्टी व तत्पुर्वी जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या उल्हासनगर विधान सभा मतदार संघ व नगर पालिका/ महानगर पालिकेवर पप्पु कलानीने १९८६ साली विजयी मुसंडी मारली व स्वबळाबर एकहाती सत्ता मिळवुन १९८६ ते १९९२ दरम्यान नगराध्यक्ष पद भुषविले.
उल्हासनगरमध्ये पप्पु कलानीला पर्याय नसल्याने व त्याच्या दबंगगिरीमुळे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे नेते पप्पु कलानीच्या ओंजळीने कसे पाणी पीत होते, हे मी पाहिले आहे.
“पप्पु कलानी बोले व कॉंग्रेस डोले” अशी परिस्थिती त्यावेळी होती. कारण त्यानेच ६० पैकी ३८ नगरसेवक निवडून आणून तत्कालिन जनता पार्टीला भूईसपाट केले होते. त्यानंतर सन १९९२- ९३ दरम्यान पप्पु कलानीने कॉंग्रेसला पुन्हा विजय विळवून देऊन तो पुन्हा नगराध्यक्ष झाला होता परंतू त्याला टाडा कायद्याखाली अटक झाल्याने त्याची नगराध्यक्ष पदाची कारकिर्द अल्पजीवी ठरली. महाराष्ट्र शासनाने उल्हासनगर पालिका बरखास्त करण्याचा विक्षिप्त निर्णय घेतल्याने माझ्या सारख्या प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांची कारकिर्दही विनाकारण अल्पजीवी ठरली होती.
या नंतर उर्वरित कालावधीसाठी पोट निवडणुक झाली.त्यावेळी पप्पु
कलानी हा तुरूंगात होता परंतू त्याच्या अटकेमुळे सिंधी समाजात जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती त्यामुळे सौ. ज्योती कलानीच्या नेतृत्वाखाली पुन्हा युपीपीची सत्ता आली व ज्योती कलानी या नगराध्यक्ष झाल्या. दरम्यान नगराध्यक्ष असलेला पप्पु कलानी १९९० साली आमदारकीच्या निवडणूकीत उभा राहिला व भाजपाचे आमदार जे १९७७ पासून १९९० दरम्यान तीन वेळा आमदार म्हणून विजयी झाले होते त्या सितलदास हरचंदानी यांचा तब्बल ५४,२५४ मताधिक्याने पराभव करून निवडून आला. त्यापाठोपाठ तुरूंगातून निवडणूक लढवून पप्पु कलानीने १९९५ ची निवडणूक ५५,३३४ मताधिक्याने जिंकून भाजपाचे साई टेकचंद मिरपुरी यांचा पराभव केला. पुन्हा १९९९ ची निवडणूक तुरूंगातूनच लढवून ३४,३१७ मताधिक्याने जिंकून भाजपचे माजी आमदार सितलदास हरचंदानी यांचा पराभव केला. त्यानंतर २००४ साली पप्पु कलानीने भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांचा तुरूंगातूनच निवडणुक लढवित पराभव करून तुरूंगातून निवडणुक लढवून ती जिंकण्याची हॅटट्रीक साधत चौथ्यांदा निवडणूक जिंकून एक विक्रम प्रस्थापित केला.
अशा प्रकारे १९८६ साली सुरू झालेली राजकिय वाटचाल २००९ पर्यंत म्हणजे २३ वर्षे अव्याहतपणे सुरू होती.
मात्र २००९ च्या विधान सभा निवडणुकीत पप्पु कलानीचा हा विजयी अश्वमेघ रोखण्यात भाजपास यश आले. भाजपाच्या कुमार आयलानीने पप्पु कलानीस प्रथमच पराभवाची धुळ चाखायला लावली. त्याचे मुळ कारणही तसेच होते. पप्पु कलानीचे खंदे समर्थक ज्यांनी पप्पुला तुरूंगात असतानाही निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली ते साई बलराम,जीवन इदनानी,मोहन गाडो,नरेंद्र (कुमारी) ठाकूर यांनी नाराज होऊन गंगाजल फ्रन्टची स्थापना करून वेगळी चुल मांडली. त्याचा लाभ अर्थातच कुमार आयलानीला झाला.
मात्र पुढच्याच निवडणुकीत सौ.ज्योती पप्पु कलानी यांनी आपल्या पतीच्या पराभवाचा वचपा काढून २०१४ च्या निवडणुकीत कुमार आयलानीचा म्हणजेच भाजपचा पराभव केला. अशा प्रकारे १९८६ ते २०१९ या कालखंडातील ३३ वर्षांपैकी २८ वर्षे पप्पु कलानीचाच उल्हासनगरच्या राजकारणात वरचष्मा राहिला.
याचसाठी उल्हासनगर म्हणजे पप्पु कलानी हे राजकिय समिकरण झाले आहे. मधल्या दोन वर्षाच्या काळात पप्पु कलानीची सून पंचम कलानी ह्या २०१८-२०१९ मध्ये सव्वा वर्षासाठी महापौर पदावर होत्या. मधल्या काळात पप्पु कलानी हे तुरूंगात असल्याने त्याचा मुलगा ओमी कलानी व सौ.ज्योती कलानी हे राजकारणात सक्रिय होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ऐनवेळी धोका दिल्याने सौ.ज्योती कलानी राष्ट्रवादीच्यावतीने निवडणुक लढल्या व त्यांचा पराभव होऊन पुन्हा भाजपचे कुमार आयलानी आमदार झाले. त्यांनतर सौ.ज्योती कलानींचे ३ वर्षापुर्वी निधन झाले. तसेच पप्पु कलानींची जन्मठेपेतून सुटका झाली.तेव्हा पासून पप्पु कलानींसह ओमी कलानी हे कलानींची धुरा सांभा़ळत आहे. त्यांच्या जोडीला पंचम कलानी व सीमा कलानीही राजकारणात पडद्यामागची भुमिका सांभाळत आहेत.
पप्पु कलानीचा राजकिय प्रवास हा चंचल राहिला आहे. सुरूवातीस कॉन्ग्रेस, नंतर युपीपी हा स्वत:चा पक्ष, नंतर अपक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष ( आठवले ) राष्ट्रवादी असा फिरता प्रवास राहिला आहे.
ओमी कलानीने मध्यंतरी टिम ओमी कलानीचा प्रयोग करून पाहिला पण तो फसला. ओमी कलानीला स्वतंत्र ओळख नाही, पप्पु कलानींचा पुत्र हीच त्याची खरी ओळख. तीन अपत्यांमुळे तो महापालिका निवडणुकीत बाद ठरतो. त्यामुळे राजकिय अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला पंचम कलानींचाच आधार घ्यावा लागत आहे. ओमी कलानी हा आमदारकीचा चेहरा होऊ शकत नाही मग तिथेही पंचम कलानी येतात. पप्पु कलानींचे वारसदार म्हणून ज्योती कलानीं नंतर पंचम कलानी यांचे नाव घेतले जात असले तरी सीमा कलानी या देेखील राजकारणात अचानक पदार्पण करू शकतात.
पप्पु कलानी यांच्याकडे वोट बॅन्क म्हणून सर्वच राजकिय पक्ष पाहतात.त्यामुळेच सर्व पक्षीय नेते त्यात एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अजितदादा पवार गटाचे आनंद परांजपे यांनी कलानी महलचे उंबरठे झिजवले आहेत.
आजही पप्पु कलानींना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.त्यात फक्त सिंधींच नाही तर नॉनसिंधी समाजाचेही मतदार आहेत.सौ.ज्योती पप्पु कलानी यांनी मृत्यूपुर्वी मी आजन्म राष्ट्रवादी सोबतच राहणार असे जाहिर वचन सुप्रिया सुळे यांच्या समक्ष जाहिर सभेत दिले होते.
आज राष्ट्रवादीत फुट पडल्याने पप्पु कलानी व ओमी कलानी कोणाला साथ देतात ? यावर पप्पु कलानी व ओमी कलानींचे राजकिय भवितव्य अवलंबुन आहे.अजित पवार हे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री आहेत म्हणून क्षणिक लाभासाठी पप्पु कलानी व ओमी कलानी शरद पवारांना सोडून अजीत पवारांच्या मोहजाळात अडकले तर त्यांचे राजकिय अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. शरद पवार, कॉन्ग्रेस व शिवसेना यांची युती आहे.या मतदार संघात फुटीनंतर शिवसेनेत ( उद्धव ठाकरेंच्या) प्रभावी उमेदवार नाही, कॉंग्रेसकडे उमेदवार असण्याचा प्रश्नच नाही, त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची उमेदवारी कलानींना मिळू शकते..ही ताकद एकवटली तर उल्हासनगर विधानसभा मतदार संघात कलानींचा विजय होणे अशक्य नाही. मात्र अजीत पवारांच्या नादी लागल्यास विद्यमान आमदार भाजपाचाच असल्याने भाजपाला ही जागा जाईल व पप्पु कलानीस हात चोळत बसावे लागेल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
राजकिय विश्लेषक

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!