गुन्हा एकाचा तर २७ जणांवर एफआयआर का ? पोलीसांचे डोकं ठिकाणावर आहे का ?
परवा उल्हासनगर ३ येथे शिवसेनेचा “चला होऊ द्या चर्चा” हा उपक्रम सुरू होता. शिवसैनिक व महिला आघाडीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू असताना एका तरूणाला पंतप्रधान नरेंद्र मोदीं विषयी मत विचारले असता, त्याने उत्सफूर्तपणे एक अश्लिल शिवी हासडली. वास्तविक अशा प्रकारे प्रतिक्रिया नेहमीच व्यक्त केल्या जातात. मालवणी भाषेत तर प्रत्येक वाक्यागणिक शिवी असते. (मालवणी वस्त्रहरण पहावे) दूरदर्शन वर तर तथाकथित उच्चभ्रू नेते तर शिव्या व अपशब्दांचा भडिमारच करतात.या बाबतीत नित्या राणे व ना-या राणे हे कुप्रसिद्ध आहेत. थोड्याफार फरकाने अनेकजण आपला संताप व्यक्त करीत असतात. मा.बाळासाहेब तर जाहिर सभांतून संतापात शिव्या हासडत. सद्या डुक्कर, गाढव, माकड, येडझवा,गद्दार, कलंक, हे शब्द अलंकारांप्रमाणे वापरले जातात. त्यांच्यावर कधी गुन्हे दाखल झाले नाहीत.
पंतप्रधान पदावरील व्यक्तिचा आदर राखणे व त्यांना अपशब्द न वापरणे हे आपले कर्तव्य आहे. परंतू पंतप्रधानांची ध्येयधोरणं व कथनी- करणीत कमालीची विसंगती असते. तरूण बेरोजगार होत आहेत, शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे, महागाईने उंचांकाची पातळी ओलांडली आहे. घरातून बाहेर पडल्यापासून कर पाठलाग करतात. वेतन एकदाच मिळते तेही कर कपात करून. तरी प्रत्येक वेळी कर भरावा लागतो. वाहन कर, रस्ता कर, भाजीपाल्यावर कर, हॉटेलात चहा प्यायलो तरी कर, जेवण, कडधान्य, शैक्षणिक साहित्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे, प्रत्येक वेळी कर भरावा लागतो. बॅन्केत पैसे ठेवले तर कर, काढले, वळते केले तरी कर, पास बुक चेक बुकला पैसे, स्वत:चे पैसे काढण्यावर कर,किमान शिल्लक नसल्यास कर, यामुळे सर्व सामान्य जनता संतप्त झालेली आहे.घरगुती व व्यावसायिक गॅसवर कर व दरवाढ यामुळे जनता त्रासली आहे.अच्छे दिनचे गाजर दाखवले, १५ लाख बॅन्केत जमा होण्याची थाप, काळा पैसा बाहेर काढण्याची थाप, नोटबंदीचा घोळ, त्यामुळे गमवावे लागलेले जीव,यामुळे मोदीजींबद्धल कोणी चांगले बोलणे शक्य नाही.
गरीबांकडून कर वसुल करायचा आणि अदानी, अंबानी व मल्यांना कर्ज देऊन ते पुन्हा माफ करायचे, हे धोरण देशाला आर्थिक खाईत लोटणारे आहे. इडी-आयटी व सीबीआयचा धाक दाखवून हजारो लाखो करोडचा भ्रष्टाचार करणारे भाजपात सामिल होताच त्यांचा भ्रष्टाचार व चौकश्यांवर पडदा पडतो, सार्वजनिक उद्योग व कंपन्या मातीमोल भावात मोदीजींच्या मर्जीतील भांडवलदारांच्या घश्यात घातले जात आहेत. सरकारी नोकर भरती रोखून कंत्राटी पद्धती अमलात आणली जात आहे. या सर्वांचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे.
त्या तरूणाने तीन शब्दांत आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली.ते अपशब्द प्रकारात मोडतही असतील परंतू त्यामागचा संताप व उद्रेक खोटा नाही. बरं ठिक आहे, तारूण्य सुलभ स्वभावामुळे त्याने शिवी दिली असली तरी तो माफ न करण्या इतका मोठा अपराध नाही.
देशात हुकूमशाहीने कसे थैमान घातले आहे याचे उदाहरण म्हणजे पोलीसांनी २७ शिवसैनिक व पदाधिका-यावर दाखल केलेला गुन्हा.
हा प्रकार म्हणजे होऊ दे चर्चा या माध्यमातून जनतेचा उद्रेक जगासमोर येत आहे, तो दडपण्याचा हा प्रयत्न.
*शिवी कोणी दिली ? एका तरूणाने. त्यामुळे गुन्हा त्या एकाच तरूणा विरोधात दाखल करता आला असता. कलम २९४ व ५०४ नुसार त्याने अपशब्द वापरून बदनामी केली असेल तर ते कलम त्यालाच लागू होते. आयोजकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या तरूणाने अपशब्द वापरले तर तोच गुन्हेगार ठरतो. तेथे उपस्थित असलेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तर अपशब्द वापरले नाहीत,हे स्पष्टपणे दिसत असताना पोलीसांनी सरसकट २७ लोकांवर गुन्हा दाखल करणे, ही कायद्याची थट्टा आहे.*
आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो त्यावेळी जर एखाद्याने मोदी किंवा सरकारला शिवी हासडली तर संपुर्ण डब्यातील १००-१५० लोकांवर २९४ नुसार गुन्हा नोंदवण्यासारखा हा प्रकार आहे. अर्थात पोलीस अधिकारी हे इतके बिनडोक मुळीच नसतात परंतू सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.
पोलीसांनी कलम २९४ अन्वये दडपशाहीने दाखल केलेला गुन्हा २६ लोकांना लागू होत नाही, त्यामुळे त्यांनी या २६ लोकांची नावं एफआयआर मधुन वगळलीच पाहिजे.
दिलीप मालवणकर
८ ऑक्टोबर २०२३