एखाद्या पक्षाचे पद मिळणे हा त्या कार्यकर्त्याचा सन्मान मानला जातो.तो सन्मान टिकवणे किंवा मातीमोल करणे हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असते. फळांनी लगडलेला वृक्ष नेहमी नम्रतेने झुकतो तर निष्फळ असलेले वृक्ष उगाच ताठरपणा दाखवात.हे ताठरलेले वृक्ष प्रत्येक पक्षात बांडगुळासारखे उगवतात व पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग आर्थिक शोषणासाठी करून स्वत: मालेमाल होतात परंतू सर्वसामान्य कार्यकर्ते हातगाडीवर वडापाव विकताना दिसतात किंवा या पदाधिका-यांचे वाहन चालकच राहतात. कार्यकर्ता निष्ठावंत असला की तो आपलं डोकं व मेंदू गहाण ठेवतो, पक्ष नेत्याच्या आदेशाची अंमलबजावणी हेच त्याचे लक्ष्य असते. नेते मोठे होतात, गब्बर होतात हा मात्र औषधपाणी व किराणासाठी झगडत राहतो. नेते विमानवारी करतात, परदेशवारी करतात, त्यांची मुलं परदेशात शिकतात, तिथेच लग्न ठरवतात व स्थिरस्थावर होतात. मात्र कार्यकर्ता व त्याचे कुटुंबीय त्याच गल्लीत पिढ्यानपिढ्या रेंगाळत राहतात. नेत्यांना कार्यकर्त्यांची गरज गर्दी दाखवण्यापुरती असते. इतर वेळी गॉगल ग्लासच्या गाडीतून धुरळा उडवत जाणारे नेते, गरजेच्या वेळी नॉटरिचेबल होणारे नेते, निवडणुक येताच आपुलकीचा दिखावा करतात.हा तर माझा खास माणुस, हा तर माझा हनुमान, हा तर माझा कट्टर अनुयायी, एकवेळ उपाशी राहील पण विकला जाणार नाही, इतका कट्टर कार्यकर्ता ! म्हणून त्याची भलामण केली जाते.
अरे बाबा, त्यालाही पोट आहे, मुलंबाळं, संसार आहे,त्यांचा विचार तू कधी करणार ? तुला भेटायचं तर झारीतील शुक्राचार्य असलेले पीए मार्ग अडवणार ! आत्ता तर प्रोटॉकॉल नावाचे फॅड निघाले आहे. डायरेक्ट यायचं नाही, जिल्हाप्रमुखा मार्फतच या ! आणि जिल्हा प्रमुख कितीही नालायक असला, कितीही घरभेदी असला तरी हरकत नाही पण प्रोटोकॉल हा महत्वाचा ! निष्ठावंतांना नकार व चमच्यांना चेल्याचपाट्यांना मुक्तद्वार ? मग सर्वसामान्य कार्यकर्ता दुरावणार नाही तर काय होणार ?
यापुर्वी ठाण्याच्या दाढीने हेच केले.माझ्या संमती शिवाय कोणीही वरिष्ठांना भेटायचे नाही ! अगदी आमदार वा नगराध्यक्ष व महापौर असला तरीही नाही. यातुनच गद्दार दाढी निर्माण होतात. ते आपली एकाधारशाही गाजवतात व त्या बळावर फुटतात ! हिंदीत म्हणतात-इंग्रेज चले गये मगर औलाद छोड गये. इथेही असेच आहे, दाढीवाले गद्दार चले गये मगर अपनी औलाद छोड गये! असे दाढी समर्थक आजही सक्रिय असून मोठ्या पदांवर विराजमान झाले आहेत.
आजकाल पदांची लांबी मारूतीच्या शेपटाप्रमाणे वाढत आहे. ती संपता संपत नाही. एकेकाळी कार्यकर्ता म्हणवून घेण्यात अभिमान वाटायचा. आत्ता पदाधिकारी इतके झालेत की कार्यकर्ताच दिसेनासा झाला आहे. प्रत्येकाला मानमरातब हवा, प्रोटोकॉल नुसार बॅनरवर जागा हवी, आमंत्रण वा कार्यक्रम पत्रिका असो, माझे नाव असलेच पाहिजे. ते कुठे असावे ? कोणाच्यावर असावे,
कोणाच्या खाली चालणार नाही ? याचे पण अलिखित नियम ठरवले जातात. पद असेल त्याला व्यासपीठावर कुठे जागा असावी, पहिल्या रांगेत की दुस-या रांगेत, उजवीकडे की डावीकडे याचेही निकष ठरवले जातात. ते पाळले गेले नाहीत तर नाराजी नाट्य रंगते व कार्यक्रमाच्या रंगात भंग आणते.
गेल्या महिन्यात शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरनाथ येथे कोंकणवासीयांचा मेळावा होता. या मेळाव्यावर याच मानापमान नाट्यामुळे स्वत:ला वरिष्ठ समजणा-यांनी बहिष्कार टाकून थांबले नाहीत तर कोणीही या मेळाव्यास जाऊ नये ! असा फतवा काढून तो अंमलातही आणला ! अहंम ब्रम्हास्मी बाकी सगळे पानी कम असा हा मिजास !
माझ्या सारख्या ५० वर्षे शिवसैनिक असलेल्यास हा तर सर्व सामान्य शिवसैनिक, याला कोणत्या नात्याने आमंत्रण द्यायचे ? असा माजोरी सवाल वरिष्ठांसमोर विचारणा-या दाढीस जाब कोण विचारणार ? सर्वसामान्य शिवसैनिक हिच माझी कवचकुंडले आहेत ! असे म्हणाणारे बाळासाहेब आज हयात नाहीत,हेच सर्वसामान्य शिवसैनिकांचे दुर्दैव आहे. अशा घरभेदी घमेंडी पदाधिका-यांना कवटाळत बसाल तर काही खरे नाही !
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०