June 29, 2025 5:49 am

मूलांना प्रॉडक्ट बनवून मानवी अपेक्षा बाळगत आहोत…!!

अपनी भाषा में पढ़े! Translate

मूलांना प्रॉडक्ट बनवून मानवी अपेक्षा बाळगत आहोत…!!

कोटा शहरातून चोवीस तासात आमची २ मूलं गेली; तर आठ महिन्यात १७ वर्षाची केवळ कोट्यातून २२ मूलं गेली… बाकीची विविध राज्य व शहरे आणि विविध प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या शेकडो मुलांच्या आत्महत्या चालूच आहेत.
एका मुलाची आत्महत्या म्हणजे आख्ख कुटुंब उध्वस्त होणे होय. अतिमहत्वाकांक्षीपणा वाढल्याने शिक्षणातील सहजता आज लोप पावलेली आहे. शिक्षण का शिकायचे तर अधिकारी होणे, डॉक्टर होणे, जबराट पगाराची नोकरी वगैरे वगैरे, पण पुढे काय ? एक उत्तम व्यक्तिमत्त्व निर्मीती आणि समाज उभारणीचे महत्वपूर्ण माध्यम असलेले शिक्षण केवळ हव्यासापोटी ‘धंदेवाईक’ केले गेले आहे. शिक्षणातील मूल्य तर हरवलेच आहे, पण अचानकपणे एखादे संकट आ वासून पुढ्यात उभे राहिले तर त्याला तोंड कसे द्यायचे याचेही उत्तर आणि ताकद नसलेली पिढी आजच्या शिक्षणातून उभी राहत आहे. हे आमचे आजचे यश आहे.
वैद्यकीय क्षेत्रात केवळ पाश्चिमात्य देशातील लोकांच्या संशोधनामुळे आज अब्जो कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचे स्वास्थ्य अबाधित आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करावे आणि आम्हाला जगवावे, स्वस्थ ठेवावे अशी परिस्थिती आहे. वैद्यकीय क्षेत्रातील वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि यंत्रणा त्यांचीच आहे. साधी आम्ही कोविड लस तयार करू शकलो नाही. याचे कारण म्हणजे आमच्याकडे शिक्षणातून सृजनशीलता, जिज्ञासा निर्माण होणार नाही अशी शिक्षण पद्धती आम्ही उभी केलीय. म्हणजे केवळ शैक्षणिक फॅक्टरीज उभ्या केल्या आहेत आणि त्यातून अवघ्या चाळीशीत म्हातारी होणारी पिढी मात्र आम्ही उभी केली आहे.
इवल्याश्या मुलांनी आत्महत्या कराव्यात आणि आम्हाला त्याचे काहीच वाटू नये इतक्या संवेदना आमच्या रुक्ष पावल्या आहेत. हे कशातून निर्माण झालेले तर आमच्या मूल्यविरहित शिक्षण पद्धतीमूळे. इथल्या प्रत्येक समस्येवर मी नाही बोलणार, किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी विविक्षित मार्गाने, विवेक शाबूत ठेवून आम्ही पुढे जाऊ शकत नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्नही करत नाही, लढणे तर दूरच आहे आणि म्हणून आज १४० कोटींचा देश अबोल झाला आहे त्यातून अनेक समस्या आ वासून पुढ्यात उभ्या आहेत. आज माझ्यापुढे नसलेली समस्या फक्त दुसऱ्या कुणाच्या पुढे उभी आहे. पण ती समस्या अपवाद वगळता प्रत्येक कुटुंबाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या पुढे उभी राहणार हे निश्चित आहे. त्यावेळी आलेल्या संकटाला आम्ही तोंडही देऊ शकणार नाही, कारण त्यावेळी आपल्या हातून वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे आम्ही आज ज्या मार्गावर मार्गस्थ आहोत ती अतिमहत्वकांक्षीपणाने ग्रस्त असून याकडे आम्हा सर्वांचे हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.
आज कोट्यात दोन मुलांनी आत्महत्या केली आहे तर आपल्या बाजूलाही फार आशादायक वातावरण नाही. माझं कुटुंब परिपूर्ण असून चालणार नाही तर आजूबाजूलाही एक परिपूर्ण वातावरण हवे तरच सामाजिक सौख्याची व्याख्या करता येईल. आज वाढलेल्या अती महत्वकांक्षा आमच्या सर्वच मनसुब्यांवर पाणी फेरणार आहेत, हे मी लिहावं म्हणून सत्य आहे असे नाही तर हे नैसर्गिक सत्य आहे. विस्कटलेली घडी सर्वांचाच बळी घेणार आहे, फक्त आज माझा नंबर असेल तर उद्या तुमचा नंबर असेल.
कौतूक कशाचे असावे ?

आम्ही मुलांना प्रोडक्ट बनवत सुटलाय!

एखाद्या अभ्यासक्रमात मी १०-१२ वर्ष घालून त्यात यश मिळविले तर ती कौतुकाची आणि मिरवून घेण्याची बाब कशी ? बुद्धी ही नैसर्गिक देणगी असून प्रत्येकाला निसर्गाने वेगवेगळे बनविले तरीही आम्ही सर्वांकडून सारखी अपेक्षा ठेवणे हीच विकृती आहे. आज अपवाद वगळता प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या महत्वकांक्षा त्यांनी स्वतः वाढवून ठेवल्या आहेत. त्याची बुद्धिमत्ता, कौशल्य, त्याची रुची, त्याच्याकडील जिज्ञासा हे कुणालाही पहायचे नाही. शंभरातील १०-२०% मूलं जेई, सीईटी, IIT वा NEET मधून लागतातच आणि लागणारच… पण त्यानंतर जे काही चित्र उभे केले जाते ते फार खतरनाक आहे. जो Allready हुशार आहे, त्याचा लहानपणापासूनच बुध्यांक चांगला आहे, तो तर ज्ञान प्राप्त करणारच, मग एखाद्या यशानंतर त्याचे कौतुक असायचे काय कारण ? वरून हे कौतुक सार्वजनिक स्तरावर तर अनेक परिणामांना जन्म देत असते त्याच्या खोलात मी जात नाही. त्याचे एक प्रेशर इतर मुलांवर सहाजिकच येत असते.
पण ज्याचा बुध्यांक कमी आहे, परंतू सरावाने, मेहनतीने त्याने अनपेक्षित यश प्राप्त केले तर त्याचे कौतुक साहजिक आहे. पण आजकाल कौतुकालाही एक इव्हेंटचे स्वरूप आलेले आहे. त्याचे धोके म्हणजे आईवडिलांची आपल्या मुलांप्रती वाढत चाललेली अतिमहत्वकांक्षा आहे…. आणि त्यातून आमची मूलं ही मूलं राहिली नसून ती आम्ही (पॅकेज रुपी) प्रॉडक्ट मध्ये रुपांतरीत करीत सुटलो आहोत…. मानवाचे रूपांतरण प्रोडक्ट मध्ये करून आम्ही पुन्हा त्यांच्याकडून मानवी अपेक्षा बाळगत आहोत ? हे कसे शक्य….!! आताही आमच्या हातून वेळ गेली नाही; आमच्या महत्वकांक्षा ज्या वाढल्या आहेत त्यावर मर्यादा आल्या तरच हाती काही लागू शकते…. आजचे आमचे यश, आनंद चिरकाल असलेच असा नाही…. इतकी घडी विस्कटलेली आहे केव्हाही संकट पुढे उभे राहू शकते. तेव्हा घात करणारे इतर कुणीही नसून आमची अती महत्वकांक्षा आमच्या पुढे संकट बनून आम्हीच उभी केली आहे. फक्त आज दुसऱ्या कुणाचा नंबर असेल तर उद्या माझाही नंबर आहे, हे निश्चित!
© प्रा संदीप कुमार देशमुख
( Sandip Deshmukh )

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!