कात्रजचा घाट बघितला; पण सांगणार कसे?
लेखिका : सीमाताई मराठे, धुळे. मो. 9028557718
संपूर्ण जगाचे ज्ञान व शहाणपण स्वत:स अवगत झाल्याचा भ्रम निर्माण झाला की, मनुष्याच्या मुर्खपणाला मर्यादा राहत नाही. त्यातही राजकारण हे क्षेत्र असे की, येथे स्वत:च्या सावलीवर सुध्दा विश्वास ठेवता येत नाही. कोण, कधी, कुठे घात करेल याची शाश्वती नाही. एकवेळ घात झाला, कुणी दगा केला तर ते मान्य. पण कुणी मुर्खांच्या रांगेत बसवले अन ते स्वत:ला कळले नाही याला काय म्हणावे? मित्र कोण अन् शत्रू कोण? एवढे ओळखण्याची सदसदविवेकबुध्दी जर स्वत:कडे नसेल तर त्या इसमाने राजकारण सोडून गृहस्थाश्रमाकडे लक्ष देणे संयुक्तीक होईल.
राजकारणात ज्याने कुणी काकांचा (शरद पवार) कात्रजचा घाट बघितला अथवा ज्यांना कुणाला काकांनी कात्रजचा घाट दाखवला त्यांची अवस्था अवघड जागेच्या दुखण्यासारखी झाली आहे. सांगताही येईना अन दाखवताही येईना. सांगितले तर हसू होईल. मुर्ख शिरोमणी म्हणुन गौरवांकित करण्यात येईल. परिणामी राजकारण ही संपण्याचा मार्गावर जाईल. नाही सांगितले तर अवघड जागेवरचा उपचार घ्यावा कुठे? अशी दयनीय अवस्था झाली आहे उध्दव ठाकरे यांची. बारामतीकर शरद पवारांनी उध्दव ठाकरेंना कात्रजचा घाट दाखविला आहे. उध्दव यांची अवस्था वर उल्लेख केल्याप्रमाणे झाली आहे. ठाकरे आणि पवारांचे बिनसले आहे या घटनेला एक महिना होत आला आहे. याची वाच्यता सार्वजनिकरित्या दोघांनीही केलेली नाही. अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे. त्याला कारणेही अनेक. मात्र वरील मुद्यांचे विवेचन कुणास लागु होईल, असे गरजेचे नाही. मात्र समर्थन करण्यासाठी अनेक राजकीय घडामोडी घडून गेल्या आहेत. त्याचा आढावा घेतल्यास या ‘घाट घाट की कहानी’ लक्षात येईल.
ठिणगी पडण्याचा प्रथम मुद्दा, शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात उध्दव ठाकरेंबद्दल नोंदविलेली निरीक्षणे. त्यात पवार लिहितात, राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बितंबातमी हवी. काय घडतंय यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल याचा अंदाज घ्यायची क्षमता हवी आणि त्यानुसार आज काय पावलं उचलली पाहिजेत? हे ठरवायचं राजकीय चातुर्य हवं. या सगळ्याच बाबतीत आम्हाला कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरीही हे टाळता आलं असतं असंही शरद पवारांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याच्या आरोप शिवसेनेच्या प्रचारामध्ये केला जातो. किंबहुना हा कळीचा मुद्दा असतो. मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी याचा पुनरूच्चार केला होता. त्याची हवा काढतांना पवार लिहितात, (पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 417) ‘मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो’, असे ते म्हणाले. तर याच पुस्तकातील 318 व्या पानावर पवार यांनी शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादाचाही समाचार घेतला आहे. ‘महाविकास आघाडी आकाराला येताना शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववाद मारक ठरेल, अशी भीती काहींना होती. शिवसेनेच्या बाबतीत माझे (शरद पवारांचे) मत ऐकाल तर, हा पक्ष वेळोवेळी कितीही जोरकसपणे भूमिका मांडो, त्यांचा वैचारिक पाया तितका भक्कम नाही. शिवसेनेच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली तर राजकारणासाठी लागणारी लवचिकता त्यांनी वारंवार दाखविली आहे’, असे पवार यांनी नमूद केले आहे. थोडक्यात काय तर पवारांनी उध्दव ठाकरेंवर अकार्यक्षमतेचा शिक्का मॅजिक शाईने मारला आहे. शिक्का उमटला तर आहे पण दिसणार नाही.
दुसरा महत्वाचा मुद्दा, शिवसेना पक्ष फुटूनही ठाकरेंनी पवारांची साथ सोडली नाही. स्वत:च्याच पक्षाच्या आमदारांवर टिका करत राहिले. त्यांना गद्दार-गद्दार म्हणत, पन्नास खोके, एकदम ओके अशी दूषणे देत राहिले. स्वत:च्याच आमदारांच्या मतदार संघात जाऊन मेळावे घेऊन निरर्थक शक्तीप्रदर्शन केले. आमदारांची ताकद कमी करण्याचा ईर्षेने उलट स्वत:चाच शक्तीपात केला. याउलट शरद पवारांनी अशा निरर्थक गोष्टी केल्या नाहीत. अजित पवारांसह गेलेल्या आमदारांना ‘दिल्या घरी सुखी रहा’ म्हणत पुन्हा दोन्ही घड्यांवर पाऊल ठेवण्याची ‘पवारांची परंपरा’ त्यांनी कायम ठेवली. इथेच उध्दव ठाकरेंनी धोका खाल्ला. शरद पवारांनी एकाएकी मवाळ भूमिका घेणे, राज्यातील पक्षबांधणीचे आपले दौरे अचानक थांबविणे, मंगळवारी पुणे येथे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी लावलेली हजेरी, या घटना पवारांच्या भुमिकांबाबत असणारा संशय अधिक गडद करतात. अजित पवारांच्या बंडामागे शरद पवारांचा हात आहे. भविष्यात हे दोघे गट एकत्र येतील, अशीही चर्चा आहे.
तिसरा मुद्दा हा की, अजित पवारांनी बंडानंतर केलेले गौप्यस्फोट. बंडानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात अजित पवार म्हणतात, 2017 मध्ये वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी व भाजपची बैठक पार पडली होती. त्यावेळेस, 25 वर्षापासून युती असलेल्या मित्रपक्षाला आम्ही सोडणार नाही. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी अशी युती होईल, असे भाजपचे वरिष्ठ म्हणाले होते. मात्र शिवसेना जातीयवादी पक्ष आहे. जातीयवादी पक्षासोबत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती. अजित पवारांचे हेच विधान उध्दव ठाकरेंना पचनी पडले नसावे. येथूनच उध्दव ठाकरे हे पवारांना भेटलेले नाही. यावरुन शरद पवारांच्या या बेभरवशी राजकारणाला उध्दव ठाकरे बळी पडलेले दिसुन येतात. या घटनांवरुन असेच दिसून येते की, उध्दव ठाकरेंना शरद पवारांनी कात्रजचा घाट दाखविला आहे आणि ठाकरेंनी तो बघितला आहे. पण खरा प्रश्न आहे, सांगणार कसे?