उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्रे हाती घेतली रे घेतली म्हणता इंदापूर तालुक्यातील ५० कोटीच्या विकासकामावरील स्थगिती उठवली
(निलेश गायकवाड )
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पहिली आनंदाची बातमी आली आहे. अजितदादांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली असून, तालुक्यातील जलसंधारणाच्या ५० कोटीच्या विकासकामावरील स्थगिती उठवली असून तालुक्यातील जलसंधारणाची कामे मार्गी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असताना इंदापूर तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला होता. जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री असताना त्यांनी तालुक्यातील ६५ ठिकाणी साठवण बंधारे बांधणे व पाच ठिकाणी रूपांतरित साठवण तलाव करण्यासाठी सुमारे ५० कोटींचा निधी मंजूर केला होता.सदरच्या कामांची निविदा ही काढण्यात आली होती. मात्र राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर ५० कोटी रुपयांच्या कामांना नवीन सरकारने स्थगिती दिल्यामुळे कामे रखडली होती. जलसंधारणाची कामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार होता.गेल्या पंधरावड्यामध्ये राज्यामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी अजितदादांकडे पाठपुरावा करुन स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
भरणे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, अजितदादांनी ५० कोटी रुपयांच्या विकासकामांची स्थगिती उठवली असल्यामुळे मदनवाडी, पिंपळे,कळस, कचरेवाडी, गोखळी, गलांडवाडी, गोतोंडी, तरंगवाडी, निमगाव केतकी, कालठन नं १, रेडा, खोरोची, रेडणी, निमसाखर, रणगाव, निंबोडी, बोरी, काझड, चाकाटी, बोराटवाडी, बावडा, कळंब, भांडगाव, काटी, कौठली, पिटकेश्र्वर, शिरसटवाडी, दगडवाडी ,सराफवाडी, कडबनवाडी, व्याहळी, काळेवाडी, भावडी, शेटफळगडे व न्हावी या गावामधील जलसंधारणाची कामे मार्गी लागणार आहेत.यासंदर्भात दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, अजितदादांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात घेतली आहेत. तसेच त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी असून तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.