समाजप्रोबोधनकार ह.भ.प शिवलीलाताई पाटील यांच्या मदनवाडी येथील कीर्तनात महिलांची उपस्थिती उल्लेखनीय
(निलेश गायकवाड )
सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मदनवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींच्या विचारधारेवर जयंती साजरी केली पाहिजे हा उद्देश मनामध्ये ठेवून मिरवणूक रद्द करत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मदनवाडी यांनी समाज प्रबोधनकार ह भ प शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. या कीर्तनासाठी परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची विशेष उपस्थिती होती.
पाटील यांनी आपल्या कीर्तनातून कीर्तन व प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे असे सांगितले . भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे.तसेच गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत असे बोलताना सांगितले.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देणारे आहे असे पाटील यांनी सांगितले . मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध आयोजकांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक देखील केले. तसेच पुढेही अशीच परंपरा सुरु राहावी असे सांगितले.