मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे !
श्री सेवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला पुरस्कार आप्पासाहेबांनी महाराष्ट्र सरकारच्या तोंडावर फेकून मारला पाहिजे !
नवी मुंबई येथील खारघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळा हा श्री सेवकांच्या मृत्युस व असंख्य श्रीसेवकांच्या दुरावस्थेस कारणीभूत ठरल्याबद्धल महाराष्ट्र राज्याचे बदनाम मुख्यमंत्री हेच व्यक्तिश: जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आत्ता पर्यंतच्या माहिती नुसार १३ श्री सेवकांचा मृत्यू झाला असून २ श्री सेवक गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. तर असंख्य श्री सेवक विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. सूर्य आग ओकत असल्याचे ठाऊक असताना व त्याची दर्पोक्ती मुख्यमंत्री व अमित शहा यांनी आपल्या भाषणात केलेली असताना सुमारे ६ लाख अनुयायांना रखरखत्या उन्हात ५-६ तास बसवुन ठेवण्याचा मुर्खपणा मुख्यमंत्र्यांनी केला. अमित शहा हे माझ्या पित्यासमान आहेत, असे जाहिर वक्तव्य करणारे मिंधे त्यांना खुश करण्यासाठी व आपले नसलेेले शक्तिप्रदर्शन दाखवण्यासाठी श्री सेवकांचे मारेकरी ठरले आहेत.मी कसा लोकनेता आहे ? व माझ्या कार्यक्रमाला कसे लाखो लोक येतात, याचा टेंभा मिरवण्यासाठी आपल्या पितृतुल्य (?) नेत्यासमोर बढाई मारण्यासाठी रखरखत्या उन्हात विना छत्र वा मंडपाच्या खुल्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्याचा महामुर्खपणा महाराष्ट्र शासनाने केला, त्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे हेच वैयक्तिकरित्या जबाबदार ठरतात. स्वत:साठी व नेत्यांसाठी शाही मंडप, एसी कुलर व आसनव्यवस्था असल्याने वेळेचे भान न ठेवता बोलबच्चनगिरी करणारे नेते श्री सेवक रखरखत्या उन्हात तासनतास बसले आहेत,याचे कौतुक करताना या नेत्यांना जनाची नव्हे तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती.
आजवरच्या परंपरे व प्रथेप्रमाणे हा पुरस्कार राजभवनात राज्यपालांच्या हस्ते प्रदान केला जातो. या उलट या मिंधे सरकारने १३ ते १५ कोटीची उधळपट्टी करीत हा सोहळा आयोजित करून पित्यासमान मानलेल्या अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार ४२° इतके तापमान असताना खुल्या मैदानात देण्याची स्टंटबाजी केली व त्या हव्यासापोटी अनेक श्री भक्तांचे प्राणहरण करून महाराष्ट्र भुषण पुरस्काराचा बाजार मांडला. २५ लाखाचा पुरस्कार देण्यासाठी १३ ते १५ कोटीची उधळपट्टी करणे याला महामुर्खपणा खेरीज दुसरा शब्दच नाही. हा खर्च केला त्यात महत्वाचा वाटा अमित शहांची बडदास्त राखण्यासाठी होता.
हिन्दीत एक म्हण आहे, बापका माल xx का बाल ! याच प्रकारे महाराष्ट्र शासनाचा महसूल मिंधे सरकार बडेजावासाठी उधळत आहे.
आज कोणतीही दुर्घटना घडली की,मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख व जखमींवर मोफत उपचार हा शासनाचा फाॅर्म्युला ठरलेला आहे. जीवंतपणी माणसांना कवडीचीही किंमत न देणारे शासन त्यांच्याच चुकीमुळे मेल्यानंतर माणसाची किंमत पाच लाख ठरवुन हात झटकून टाकते.मुख्यमंत्र्यांच्या चहापानाचा् खर्च करोडोत जातो. पक्षाशी गद्दारी करण्यासाठी ५० खोके दिले घेतले जातात, पण सर्व सामान्य माणसाची किंमत शासनाच्या लेखी ५ लाख असते.एका कुटुंबाचा कर्ता पुरूष जातो, आई बापाचा मुलगा जातो,एक सौभाग्यवती विधवा होते, लेकरं अनाथ होतात आणि हे निर्ढावलेले राजकारणी ५ लाख भिरकाऊन कर्णाचा आव आणतात.
महाराष्ट्र भुषण हा पुस्कार श्री सेवकांच्या मृत्यूमुळे कलंकित व रक्तरंजीत झाला आहे. मननीय आप्पासाहेब धर्माधिकारी हे श्री सेवकांनाआपल्या कुटुंबचे सदस्य मानतात.त्यामुळे त्यांनी जसा २५ लाखांचा धनादेश शासनास परत केला तसेच त्यांनी श्री सेवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा महाराष्ट्र भुषण हा कलंकित पुरस्कार तातडीने महाराष्ट्र शासनाच्या तोंडावर फेकुन मारला पाहिजे, तरच त्यांची प्रतिमा व प्रतिष्ठा अवकाशाला गवसणी घालेल.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
ज्येष्ठ पत्रकार