कालावधीपूर्वी गाळप केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करणार – सहकारमंत्री अतुल सावे
गणेश ननवरे
मुंबई दि. 9 – पुणे येथील बारामती ॲग्रो लि. शेटफळ या साखर कारखान्याने गळित हंगामाच्या प्रारंभीची निश्चित तारखेच्यापूर्वी गाळपास सुरुवात करून कारखान्यास वितरित करण्यात आलेल्या गाळप परवान्यामध्ये नमूद अटी शर्तींचा भंग केल्याने कायदेशीर सल्ल्यानुसार सदर कार्यकारी संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सविस्तर अहवाल मागविला असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
१५ ऑक्टोबरपूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू करून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बारामती ॲग्रो लि. शेटफळ या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सदस्य प्रा.राम शिंदे यांनी लक्षवेधी मांडली. यास उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे बोलत होते.
मंत्री सावे म्हणाले, संबंधित साखर कारखान्याने वेळेपूर्वी गाळप सुरू केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, किती गाळप करण्यात आले याचा अहवाल मागवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री सावे यांनी दिली.