गनिमांचे हे चोरलेले यश अल्पजीवी ठरेल !
फंदफितुरी व कपटकारस्थान करून मिळवलेले शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे शिंदे गटाला मानवणार नाही व ते जास्तकाळ याचा आसूरी आनंद घेऊ शकणार नाही. निवडणूक आयोग हे केंद्र शासनाचे अंकित असल्याने त्यांनी बंडखोरांना शिवसेना हे नांव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले असले तरी हा आसूरी आनंद जास्त काळ टिकणार नाही,असे दिसते.
धनुष्यबाण हे प्रभू रामचंद्रांसारख्या सत्य वचनी व एकवचनीसच शोभून दिसते.रावणाने ते उचलण्याचा किंवा पळवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पेलवणार नाही. रावणाने सीता पळवली आणि रामायण घडले, आधुनिक रावणांनी कपटनीतीने शिवसेना व धनुष्यबाण पळवले, परंंतू त्यानंतर जे मन्वंतर घडणार आहे,त्यात हे रावण व त्यांची सोन्याची लंका भस्मसात होईल, याची मला खात्री आहे. नांव आणि चिन्ह मिळवले परंतू मतदार कु़ठून व कसे मिळवणार ? गद्दारांना मतदान करण्याइतकी जनता मुर्ख नाही.
त्यामुळे, धनुष्यबाण व शिवसेना हे नाव व भाजपाच्या कुबड्या घेऊन देखील निवडणूकीस सामोरे जाण्याची धमक या गद्दारांमध्ये असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. मतदार त्यांना भूईसपाट करून अस्मान दाखवल्या खेरीज राहणार नाहीत.
स्वत:मध्ये लग्न करून बायको आणायची धमक नसली की दुस-याची सुंदर बायको अनैतिक मार्गाने पळवून तिला आपले नाव व कुंकू लावून मिरवण्यासारखा हा प्रकार आहे.अरे, हिंमत असती तर-राज ठाकरें सारखा स्वतंत्र पक्ष काढून ताकद अजमवायची होती ! निवडणूक आयोगाशी संगनमत करून शिवसेना व चिन्ह पळवून नेले, यात कसली आली मर्दुमकी ??
निवडणूक आयोगाने जरी पक्षपातीपणे नाव व चिन्ह दिले असले तरी ते या गद्दारांना मानवणार नाही. निवडणूक आयोगाने अशा परिस्थितीत चिन्ह गोठवले असते तरी निवडणूक आयोगाच्या हेतूबद्धल शंका घेता आली नसती. शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही,त्याची नोंदणी नाही, घटना देखील नाही, तरी निवडणूक आयोगाने वांझोट्या दांपत्यास टेस्टट्युब बेबी प्रमाणे रेडीमेड अपत्य दिले आहे. त्याचे खरे आई बाप कोण ? याचा थांगपत्ता नसताना”शिंदे गट” मुलग झाला हो ~~~ अ़शी आरोळी ठोकत अपत्य प्राप्तीचा जल्लोष साजरा करीत आहे.
या अवैध संतानप्राप्ती विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेना जाणारच आहे. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीतील सर्वोच्च अधिष्ठान आहे.तेथे निवडणूक आयोगाचा पक्षपाती,मनमानी व राजकिय कुहतूने घेतलेल्या घिसडघाईच्या निर्णयास तूर्तास स्थगिती मिळेल व नंतर सत्य लक्षात येताच शिवसेना हे नांव व धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा सन्मानपूर्वक शिवसेनेस बहाल केले जाईल व सत्याचा अंतिम विजय होईल,असा मला विश्वास आहे.
दिलीप मालवणकर