ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी ठाण्यापासून कोसो दूर असलेल्या साता-याच्या शंभूराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. घरचा गडी नामर्द असेल तरीही दुसरा घरधनी कोणी शोधत नाही,आहे त्यातच समाधान मानले जाते.पण मिंधे सरकारचे काम जगावेगळे आहे.रविंद्र चव्हाण सारखा सक्षम मंत्री असताना साताराहून आयात केलेला मंत्री ठाणे जिल्ह्याच्या बोकांडी मारला गेला आहे.एकीकडे म्हणायचे की भाजपाची महाशक्ति आमच्या पाठीशी आहे,ती काही कमी पडू देणार नाही,आणि दुसरीकडे भाजपाच्या एका सक्षम मंत्र्याला ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नेमताना अस्पृश्यासारखी वागणूक दिली जाते. यावरून एकनाथ शिंदे हे किती आतल्या गाठीचे व आत्मकेंद्रित आहेत हेच सिद्ध होते. भाजपाकडून सर्व काही व मुख्यमंत्री पद ओरबाडून घेणारे शिंदे भाजपाला पालकमंत्री देताना इतके संकुचित व कृपण कसे होऊ शकतात ? याचे कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.कारण ते लेना बॅन्क आहेत,देना बॅन्क नाहीत. ते जर जन्मदात्या शिवसेनेशी गद्दारी करू शकतात,शिवसेनेस नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे रचतात ते भाजपाशी प्रामाणिक राहण्याची अपेक्षा करणे म्हणजे बोक्यासमोर दुध ठेवले असताना त्याने ते न गटकावण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. ज्या माणसाने पुत्र मोहापायी कल्याण मतदार संघातील खासदार आनंद परांजपेंना सळो की पळो केले व पळवून लावले, ठाण्यातील ज्येष्ठ नेते कै.अनंत तरे यांना राजकीय विजनवास भोगायला लावला, दिघे साहेबांचे सख्खे पुतणे केदार दिघे यांना खड्यासारखे बाजूला सारले व पदापासून वंचित ठेवले ते एकनाथ शिंदे भाजपाच्या रविंद्र चव्हाण यांना ठाण्याचे पालकमंत्री पद देऊन औदार्य दाखवतील,ही अपेक्षा करणेच मुर्खपणा ठरावा.साता-याचे संभूराजेराजे ठाण्यावर लादणे हा एक प्रकारची बळजबरी व मनमानी आहे. निव्वळ भाजपास ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्याची संधी मिळू नये,आपली मक्तेदारी अबाधित रहावी हाच या मागचा एकमेव हेतू आहे. रविंद्र चव्हाण हे एक ज्येष्ठ व सक्षम नेते आहेत म्हणून त्यांना ठाण्याबाहेर तडिपार करून साता-याहून शंभूराजे यांना आयात केले आहे,कारण शंभूराजे नाममात्र पालकमंत्री बनून राहतील व एकनाथ शिंदेच ठाण्याचे ठाणेदार राहतील.यापासून भाजपाने काही धडा घेता येतो का ते पहावे व आत्मपरीक्षण करावे.शिवसेनेस शह देण्याच्या नादात आपण कोणाला दुध पाजत आहोत ? याचा विचार करावा. भाजपाला कल्याण लोकसभा मतदार संघ हवा आहे.कल्याणकरांना देखील ठाण्यातून आयात केलेला उमेदवार नको आहे, स्थानिक भूमिपुत्र उमेदवार खासदार असावा, असे वाटते. परंतू एकनाथ शिंदेंना आपल्या मुलालाच कल्याण लोकसभा मतदार संघ आंदण दिल्याप्रमाणे टिकवून ठेवायचा आहे. भाजपाकडे रविंद्र चव्हाण सारखा सक्षम उमेदवार असताना भाजपाने शिंदे गटाच्या पालख्या का वाहाव्यात ? आत्ता शिंदे गट हा शिवसेनेपासून विभक्त झालेला व भाजपाचा आश्रीत असा कमकुवत गट आहे. त्यामुळे त्यांना डोईजड न होऊ देणे ही भाजपाच्या चाणक्यांची जबाबदारी आहे.दुसरा महत्वाचा व जनहिताचा मुद्दा लक्षात घेतला गेला पाहिजे.ठाणे हा एक मोठा व महत्वाचा जिल्हा आहे. त्यासाठी पालकमंत्री हा स्थानिकच हवा.ठाण्याच्या असंख्य समस्या आहेत.या दैनंदिन समस्यांच्या निवारणासाठी ठाणेकरांनी रोज साता-याची वारी करावी अशी एकनाथ शिंदे यांची अपेक्षा आहे का ? आपल्या राजकीय महत्वकांक्षेच्या हव्यासापोटी एकनाथ शिंदे हे ठाणेकरांना वेठीस धरून ठाणेकरांचीच प्रतारणा करीत आहेत.
दिलीप मालवणकर
9822902470