अमळनेरच्या अतिक्रमित व्यवसायिकांची मागणी तीव्र; भूखंड १२३ मधील दुकाने मिळवण्यासाठी पालिकेवर मोर्चा
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील अतिक्रमित व्यवसायिकांनी आपले हक्काचे दुकान मिळावे, यासाठी आज अमळनेर नगरपालिकेवर जोरदार मोर्चा काढला. भूखंड क्रमांक १२३ अ व ब मधील दुकाने अतिक्रमित दुकानदारांना द्यावीत, या मागणीसाठी हा मोर्चा प्रा. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
भागवत रोड आणि आठवडे बाजार परिसरातील अनेक दुकानदार गेली २७ वर्षे आपला व्यवसाय करत आहेत. १९९९ मध्ये नगरपालिकेने अतिक्रमित दुकानदारांना अधिकृत गाळे देण्याचे आश्वासन जाहिरातीतून दिले होते. त्यावेळी तब्बल १२० टपरीधारकांनी पहिल्या हप्त्याचे ₹१०,००० भरणा केले होते. २००६ मध्येही पालिकेने आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत गाळे देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर, अमळनेर व्यवसायिक संघटनांनी एकत्र येत बसस्थानक ते भाजी मार्केट मार्गे मोर्चा काढत पालिकेवर धडक दिली. घोषणाबाजी करत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील मुख्य मागण्या –
भूखंड १२३ वरील दुकाने अतिक्रमित व्यवसायिक संघटनेच्या सभासदांनाच द्यावीत.
अधिकृत गाळे मिळेपर्यंत सध्या असलेल्या ठिकाणीच व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी.
दुकान वाटपाच्या निर्णयप्रक्रियेत संघटनेला विश्वासात घ्यावे.
संघटना सकारात्मक चर्चेसाठी सदैव तयार आहे.
या मोर्चात सचिव पदमेश सोनवणे, अरुण भावसार, आनंद सुरळकर, अनिल चोरडिया, भटू जगताप, पी. जी. टेलर, भरत बडगुजर, किशोर बारी, गोपाळ परदेशी यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.