आमदार भास्कर जाधवांनी माझे काम सोप्प केलं….
माझं काम आमदार भास्कर जाधवांनी सोपं केलं. मला जे बोलायचं लिहायचं होतं ते आमदार जाधव बोलले.काहींना मिरच्या झोंबल्या तरी ते सत्यच बोलले आहेत म्हणून त्यांचे समर्थन करणे आवश्यक आहे. मी कित्येक दिवस मौन बाळगून होतो परंतू आमदार जाधवांनी माझ्या मौनाचा भंग करायला भाग पाडले.
शिवसेनेत पदं नेमताना किंवा तिकिट वाटप करताना हल्ली वशिलेबाजी केली जाते. जेव्हापासून प्रोटोकॉल ही पद्धत अंमलात आली तेव्हा पासून यात लक्षणीय वाढ झाली. जिल्हाप्रमुखामार्फत पदाधिका-यांची नावे संपर्क नेत्याकडे पाठवली जातात व त्यावर शिक्का मोर्तब केले जाते. जिल्हा प्रमुख हा अतिमहत्वाकांक्षी असला तर तो आपल्या अंधसमर्थकांची नावे पाठवतो व स्वतः चे स्थान बळकट करतो. असे अंधसमर्थक हे पक्षनिष्ठ पेक्षा व्यक्तिनिष्ठ असतात. ज्यावेळी जिल्हा प्रमुख बदलण्याची वेळ येते किंवा तिकिट वाटपाची वेळ येते तेव्हा हे जिल्हाप्रमुख आपल्या समर्थकांच्या राजिनाम्याची ढाल पुढे करून पक्ष
प्रमुखास ब्लॅकमेल करतात.ठाणे व कल्याण लोकसभा /विधानसभा मतदार संघात याचा प्रत्यय येतो. पुढे हाही ढोका संभवतो की जर एखादा पदाधिकारी पक्ष सोडून जातो तेंव्हा या व्यक्ती निष्ठ कार्यकर्त्यांची फौज त्याच्या पाठोपाठ गद्दारी करते.
अनेक शहरात असे पदाधिकारी संस्थानिक म्हणून वावरतात. त्यांच्या खेरीज अन्य कोणाचे नाव सूचविणे हा पक्षद्रोह मानला जातो. लोकसभेला तोच विधानसभेला तोच व पराभूत झाल्यावर तोच महापालिकेचा उमेदवार असतो. मी माझी पत्नी, माझी वहिणी, माझा मुलगा व जमल्यास पुतण्या.मी कोणाबद्धल बोलत आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. आमच्या उल्हासनगर मधेही वेगळी परिस्थिती नाही. प्रत्येक पदाधिकारी हा माझ्याशीच एकनिष्ठ असला पाहिजे हाच एकमेव निकष पदाधिकारी निवडताना केला जातो.काही दिवसांपुर्वी प्रकाशित झालेली यादी हे याचे उत्तम उदाहरण आहे. यात पक्षनिष्ठ
किती व आयाराम किती ? हे पहिल्याच नजरेत कळते.
शिवसेनेत गटबाजी व पाडापाडी नवीन नाही. गणेश नाईक व साबीर शेख यांचा दिघे विरोधी गट व आमचा दिघे समर्थक गट आम्ही ९० च्या दशकात अनुभवला आहे. एखाद्या व्यक्तिचे स्तोम माजवले, त्याला सर्वाधिकार दिल्यानंतर काय होते ? हे आपण अनुभवले आहे.नारायण राणे म्हणजे कोंकण,गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई तर ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे,छगन भुजबळ म्हणजे नाशिक व राज ठाकरे म्हणजे विद्यार्थी सेना प्रमुख व दुसरे सत्ता केंद्र असे जणू समिकरणच झाले होते. त्या त्या विभागाचे शिवसेना प्रमुख असल्यागत ते वागायचे.त्याचे दुष्परिणाम आज आपली शिवसेना भोगत आहे.
या पासून बोध घेऊन पदाधिकारी नेमताना ते त्या परिसराचे संस्थानिक होऊन डोइजड होणार नाहीत,याची दक्षता बाळगली पाहिजे.जे विद्यमान संस्थानिक आहेत त्यांची संस्थाने बरखास्त झाली तरच शिवसेनानिष्ठांची फौज उभी राहिल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक व
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०