करमाळा प्रतिनिधी :- करमाळयातील गायींनी रास्ता रोको केल्याचे चित्र आज किल्ला वेस येथे पहायला मिळाले. करमाळयातील प्रत्येक चौका चौकात गायी ठाण मांडून बसत असतात. त्यामुळे वाहतुकीला तर अडथळा होतोच त्याचबरोबर विद्यार्थी, वयोवृध्द, सामान्य नागरिक यांनाही जीव मुठीत धरून वाट काढावी लागते किंवा रस्ता बदलून जावे लागते. त्यामुळे करमाळयातील मोकाट गायींचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. या मोकाट गायींमुळे मागील काही वर्षात घातलेल्या धुमाकूळामुळे एका सामान्य नागरिकाला जीवाला मुकावे लागले होते. अनेकवेळा गायी जोर जोरात रस्त्यावरच उधळत असल्याने व एकमेकींना शिंगाच्या टोकांनी मारहाण करीत असल्याने त्याचा धोका इतर नागरिकांनाच्या जीवाला ही होवू शकतो.
आजही किल्ला वेस येथे गायींनी ठाण मांडून बसल्याने नागरिकांना वाहने झुंडीमधून बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागली. नगरपरिषद प्रशासन त्यांची दखल घेवून कोंडवाडयात त्यांना स्थान देत नसल्याने किंवा जे त्याचे मालक आहेत ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या विरोधात गायींनी रास्ता रोको आंदोलन केले असल्याचा भास या निमीत्ताने वाहनचालकांना व नागरिकांना उपस्थित होत होता.
नगरपरिषद प्रशासनाला या विषयी विचारणा केली असता कोंडवाडयाची सोय नसल्याने गायींना बांधून ठेवण्याचा प्रश्न उध्दभवत असल्याचे सांगण्यात आले तर दुसरीकडे या मोकाट गायी हया राजकीय पुढाऱ्यांच्या असल्याने त्यांना प्रशासन दबावापोटी बंदोबस्त करीत नसल्याच्याही चर्चा ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. सध्या करमाळयात दोन गोपालन संस्था कार्यरत असून अशा मोकाट गायींना पकडून नगरपरिषद प्रशासनाने कागदोपत्री करार करून गोपालन संस्थेच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. अन्यथा करमाळयात विद्यार्थी, नागरिक, वयोवृध्द व्यक्तींना जीवाला मुकावे लागणार हे मात्र नक्की. त्यामुळे प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.