शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा निर्णय स्वागतार्ह : हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी भगवान लोंढे दि.8/9/23
छत्रपती शिवाजी महाराजांची सध्या ब्रिटनमध्ये असलेली ऐतिहासिक वाघ नखे भारतात आणण्याचा महायुती सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे वाघनखे भारतात येत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
वाघ नखे ब्रिटन सरकारने भारताला परत करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे वाघ नखे भारतात परत आणण्याच्या अधिकृत प्रक्रियेसाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सप्टेंबर महिन्यात लंडनला भेट देणार आहेत. तेथे ते व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमसोबत सामंजस्य करार करतील. ही वाघ नखे या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटून ही वाघनखे त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे द्यावीत अशी विनंती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार करणार आहेत. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा चालु वर्षी साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवरती चालू वर्ष अखेर ही वाघ नखे भारतात आणण्यात येत आहेत, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.