जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान इंदापूर कडून अकलूजच्या दिशेने.
निरा नरसिंहपुर:दिनांक- 23. प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान हे आज सकाळी इंदापूर येथून अकलूज कडे होत आहे. कालचा मुक्काम हा इंदापूर येथे झाला. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये असणाऱ्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे तसेच माजी आमदार माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही पालखीचे दर्शन घेतले व इंदापूर पासून बावड्या पर्यंत पालखी बरोबर चालण्याचा आनंद घेतला.
यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांनी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे व पाऊस भरपूर पडू दे अशी प्रार्थना विठुराया चरणी केली.
त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांनीही सांगितले की हा सोहळा हा खूप अद्भुत सोहळा असतो व याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी खूप मोठे भाग्य लागते आणि आज हे जग हे फक्त सांप्रदायावर टिकलेले आहे असे ते म्हणाले तसेच धो धो पाऊस पडून बळीराजाला सुख मिळू दे, गुराढोरांना, पिकांना आणि लोकांना भरपूर पाणी मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी विठुराया चरणी केली.
डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी इंदापूर तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी आणि भक्तांनी या पालखीचा मनमुराद आनंद लुटला. अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये ही पालखी आज सकाळी इंदापूर कडून अकलूज कडे जाण्यासाठी निघाली आहे. आज पालखीचा मुक्काम हा सराटी येथे होणार आहे. सराटी येथे भरपूर प्रमाणात भाविक जमलेले आहेत व पालखीचा आनंद घेत आहेत.