पुरोगामीत्वाची दांभिक चाल अन जातीय अजेंड्याची फडणवीशी कमाल
दत्तकुमार खंडागळे
‘महाराष्ट्र भुषण’ या पुरस्काराचे नाव आता बदलायला हवे. ‘महाराष्ट्र भुषण’ ऐवजी ते ‘ब्राम्हण भुषण’ असे ठेवायला हरकत नाही. गेल्या काही वर्षात हा पुरस्कार वादग्रस्त होतो आहे. पुरस्काराची घोषणा झाली रे झाली की वादंग माजते आहे. या पुर्वी असं होत नव्हत. समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणा-या अनेकांना हा पुरस्कार दिला गेला. विशेष म्हणजे आजवर ज्यांना ज्यांना महाराष्ट्र भूषण दिला गेला त्यातले बहूसंख्य ब्राम्हण असतानाही लोकांना काहीच वाटले नाही. कसलीही खळखळ झाली नाही. ज्यांना पुरस्कार दिला गेला त्यांच्याकडे कुणी ब्राम्हण म्हणून पाहिलेही नाही. गेल्या काही वर्षात हा पुरस्कार मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरतो आहे. या पुर्वी पुरस्कार दिले पण ते जातीय अजेंड्याने दिले जातायत असे लोकांना कधीच वाटले नाही. २०१४ ला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळाले. आणि त्यांनी या पुरस्काराच्या खिरापतीला जातीय अजेंड्याचे स्वरूप दिले. त्यांच्याकडून पहिल्यांदाच वादग्रस्त असलेल्या बळवंत पुरंदरे यांना हा पुरस्कार दिला गेला. पुरंदरेंना पुरस्कार देण्याची घोषणा करताच मोठे वादंग माजले. त्यावेळी चित्रलेखाचे संपादक महाराव सर, प्रतिमा परदेशी व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यभर शिवसन्मान परिषदा घेवून पुरंदरेंना पुरस्कार देण्यास कडाडून विरोध केला. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत पुरंदरेंच्या जातीयवादी विकृतीला नागडं-उघडं केलं. बळवंत पुरंदरेंच्या विरोधात राज्यभर असंतोष खदखदत असतानाही पुरंदरेंना पुरस्कार दिला गेला. मोठ्या बहूमताचे सरकार असल्याने फडणवीसांनी विरोधाला न जुमानता अखेर तो पुरस्कार पुरंदरेंना दिलाच. बळवंत मोरेश्वर पुरंदरेंनीही निगरगट्टासारखा तो घेतला. त्या ठिकाणी खरच एखादी संवेदनशील व स्वाभिमानी व्यक्ती असती तर त्याने तो पुरस्कार नाकारला असता, पण असे काही झाले नाही. पुरंदरेंनी तो आनंदाने घेतला. आताही तेच झाले. धर्माधिकारी यांनीही पुरंदरेंचीच री ओढली. असल्या मायाबाजाराच्या वर उठण्याची किमया असणा-या अध्यात्मात असणारे धर्माधिकारी पुरस्कार व प्रतिष्ठा नावाच्या मायाजालात फसले आहेत. त्यांनाही हा मायाजाळ नको वाटला नाही हे विशेष. संत तुकारामांना छत्रपती शिवरायांनी नजराना दिल्यानंतर तुकोबारायांनी त्यांच्या भावना अभंगातून शब्दबध्द केल्या आहेत. ते म्हणतात, दिवट्या, छत्री, घोडे । हे तो ब-यात न पडे।। येथे पंढरीराया । मज गोविसी कासया ।। मुंगी आणि राव । आम्हा सारखाची देव ।। गेला मोह आणि आशा । कळीकाळाचा हा फासा ।। सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ।। छत्रपतींचा नजराणा परत पाठवणा-या ख-या संत तुकारामांचा हा अध्यात्मातला वारसा धर्माधिका-यांना अजून कळला नाही की वळला नाही ?
मधल्या काळात महाविकास आघाडीची अडीच वर्षे सत्ता होती. आघाडी सरकारने ‘महाराष्ट्र भुषण’ ची घोषणा केली नाही. फडणवीस सत्तेत येताच त्यांनी जातीय अजेंडा व कोकणातील राजकीय गणितं डोक्यात ठेवून ज्युनियर धर्माधिकारींना महाराष्ट्र भुषण पुरस्कार घोषित केला. सदरचा पुरस्कार घोषित होताच वादाची वात पेटली आणि पुन्हा त्याची खळखळ शांत झाली. सरकारने प्रचंड खर्च करत दिमाखदार पुरस्कार सोहळा घेतला. या सोहळ्यात अनेकांचा जीव गेला. या सोहळ्यासाठी सरकारी तिजोरीतल्या कोट्यावधी रूपयाची उधळपट्टी केली गेली. या पुर्वीच्या कॉंग्रेस-आघाडी सरकारने सिनियर धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार या पुर्वी दिला होता. फडणवीसांनी सत्ता येताच तो त्यांच्या चिरंजीवालाही देवून टाकला. फडणवीसांना अजून एखादी पंचवार्षिक मिळाली तर नातवालाही हा सन्मान मिळेल. एकाच घरात तिघा-चौघांना मिळू शकतो. या सोहळ्यासाठी केलेली उधळपट्टी पाहून पेशवाईतल्या ब्राम्हण भोजनावळींची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. पेशवे सत्तेत आले आणि ब्राम्हण भोजनावळींना उत आला होता. स्वराज्याच्या तिजोरीतला खजिना भोजनावळीवर उधळला जात होता. आताही तेच चित्र दिसते आहे. पण यात देवेंद्र फडणवीसांचे काय चुकतेय असे वाटत नाही. ते ज्या विचाराचे आहेत, ज्या कंपूतले आहेत त्या विचारासाठी व त्या कंपूसाठी ताकद पणाला लावून काम करत आहेत. ते त्यांच्या विचाराशी प्रामाणिक आहेत. त्यांनी धर्माधिकारी व पुरंदरेंना पुरस्कार दिला. त्यांची ही भूमिका त्यांच्यासाठी योग्यच आहे. ते त्यांच्या विचारांशी व कंपूशी प्रतारणा करत नाहीत. पण त्या आधी अडीच वर्षे राज्यात आघाडीचे सरकार होते. पुरोगामीत्वाची झुल घेणारे, ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर राजकारणाची वात पेटवून राजकीय लाभ उठवणारे सत्तेत होते. त्यांनी पुरोगामी चळवळीतील कुणालाच महाराष्ट्र भुषण पुरस्कार का दिला नाही ? पुरंदरेंना पुरस्कार दिला तेव्हा शिवसन्मान परिषदा घेणारे जिंतेंद्र आव्हाड मंत्री झाले. ते ही सरकारात बसले. तेव्हा त्यांनी पुरंदरेंचा पुरस्कार परत घ्यावा अशी भूमिका मांडली नाही किंवा चळवळीतल्या कुणाला पुरस्कार द्यावा अशी मागणीही का केली नाही ? पुरोगामीत्वाची झुल अंगावर घेवून मतांचे पिक काढणा-या घड्याळवाल्यांनी चळवळीतल्या कुणाला पुरस्कार का दिला नाही ? महाराष्ट्रात काम करणारी, राज्यासाठी झिजणारी, आयुष्य देणारी खुप लोकं आहेत. साहित्य, कला, क्रिडा, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे अनेक चांगले चेहरे आहेत. त्यांचे काम या पुरस्कारापेक्षाही मोठे आहे पण सत्ता हातात असतानाही त्यांना पुरस्कार द्यावा असे या लोकांना का वाटले नाही ? हा खरा चिंतनाचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावाने बोंबलण्यात काय अर्थ आहे ? ते त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. ते दांभिक किंवा ढोंगी नाहीत. इकडे महाराष्ट्र पुरोगामी करण्याचा संकल्प घेवून यात्रा काढणारे, निवडणूकीच्या तोंडावर डोक्यावरच्या पगड्या बदलणारे सत्तेत आल्यावर पुरोगामीत्व कसे विसरतात ? त्यांना सत्ता मिळवून देणा-या या लोकांची आठवण सत्ता आल्यावर का होत नाही ? पुरोगामी चळवळीत सध्या रोष आहे. ही मंडळी फडणवीसांना शिव्या घालत आहेत. त्यांना शिव्या घालून काय उपोयग ? पुरोगामीत्वाचे पिक कापणा-या कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांच्या बखोटीला पकडायला हवे. हा एकूण प्रकार म्हणजे ‘पुरोगामीत्वाची चाल आणि जातीय अजेंड्याची फडणवीशी कमाल’ असाच आहे.
‘पोळीला आम्ही आणि गोळीला चळवळ’ अशी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची मानसिकता आहे. हे दांभिक आहेत. त्यांना सत्ता गेल्यावर पुरोगामीत्व आठवतं. सत्ता गेल्यावर ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर वाद आठवतो. सत्ता आली की परत ते ही शेंड्या कुरवाळतात. शेंडीवाल्यांचे खांदे चोळतात. त्यांच्या पायावर जाऊन आम्ही कसे सर्वसमावेशक आहोत हे दाखवण्याचा अट्टाहास करतात. उजव्या विचारांची लोकं अशी दांभिक वागताना दिसत नाहीत. त्यांचा विचार चुकीचा आहे पण त्यावरची त्यांची निष्ठा प्रामाणिक आहे. ते साडेतीन टक्क्यांच्या हितासाठी कटीबध्द आहेत. पण इकड काय ? पुरोगामीत्वाची झुल अंगावर घेतलेली मंडळी फक्त बायका-पोरांसाठी, भाऊ-पुतण्यासाठी आणि फार झालं तर पै-पाहूण्यांच्या हितासाठी कटीबध्द असतात. त्यांना सत्ता आल्यावर आपला विचार कुठला आहे ? त्याच्याप्रती आपली बांधिलकी काय आहे ? याचेही भान रहात नाही. पुरोगामीत्वाचे राजकारण आणि चळवळीचे म्हणून अशा भामट्यांना सत्ता दिल्यावर अपेक्षा कुणाकडून ठेवायच्या ? दरवेळी अशाच भामट्यांना डोक्यावर घेवून नाचणा-यांनी फडणवीसांच्या नावे का बोंब ठोकावी ? बोंब ठोकायची आहे तर पुरोगामीत्वाचे दांभिक राजकारण करणा-या या भामट्यांच्या विरोधात ठोकायला हवी. त्यांनाच जाब विचारायला हवा.