गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाई खातांय सावधान
‘फूड पॉइझनिंग’नंतरही कारवाई नाही, अमळनेर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील राजस्थान स्वीट मार्टमधून केक खाल्ल्यानंतर दोघांची प्रकृती बिघडल्याच्या घटनेला काही दिवस उलटूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणात नेमके कारण काय होते, केकमध्ये वापरण्यात आलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ कुठून आणले गेले, त्यांची गुणवत्ता अद्याप तपासण्यात आली नाही. याचा तपास करून दूध विक्रेता आणि संबंधित दुकानदाराची जबाबदारी निश्चित करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित घटना घडल्यानंतरही कारवाईबाबत स्पष्टता नसल्याने प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ नमुने घेणे किंवा पंचनामा करण्यापुरती कारवाई न राहता या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे. दूध विक्रेत्यापासून मिठाईच्या दुकानापर्यंत खाद्यपदार्थाची साखळी तपासली गेली पाहिजे. अन्यथा अशा प्रकारांना आळा कसा बसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, मोदक, पेढे, श्रीखंड, क्रीमयुक्त पदार्थांसह विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे.
त्यामुळे नागरिकांनीही खाद्यपदार्थ खरेदी करताना दुकानाची स्वच्छता, पदार्थाची ताजेपणा, पॅकबंद पदार्थांची निर्मिती व अंतिम वापराची तारीख आणि लेबलवरील माहिती तपासावी. संशयास्पद किंवा खराब वाटणारा पदार्थ खरेदी अथवा सेवन करू नये. मात्र नागरिकांनी सतर्क राहण्याबरोबरच अन्नाची गुणवत्ता तपासणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. राजस्थान स्वीट मार्टच्या केकप्रकरणात दूध विक्रेता व दुकानदाराची जबाबदारी निश्चित करून कारवाई कधी होणार, याकडे आता अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.