करमाळा: करमाळा तालुक्यातील नामांकित शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवभारत इंग्लिश स्कूलने व गिरधरदास देवी विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून एक आदर्श पायंडा पाडला आहे. सध्या ही शाळा तालुक्यातील ‘सर्वात सुरक्षित शाळा’ म्हणून ओळखली जात असून, पालकांमध्ये या सुरक्षा व्यवस्थेमुळे मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, केवळ अलीकडेच नव्हे तर गेल्या १२ वर्षांपासून या शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे.
प्रत्येक वर्गखोलीत, वर्गखोल्यांच्या बाहेर, शाळेच्या मोठ्या मैदानावर, प्रवेशद्वारावर (गेट) तसेच आवश्यक त्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी एकूण २६ अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या सर्व कॅमेऱ्यांचे संपूर्ण नियंत्रण आणि मॉनिटरिंग शाळेच्या सर्वेसर्वा सुनिता देवी यांच्या थेट देखरेखीखाली चालते, ज्यामुळे सुरक्षिततेचा दर्जा राखला जातो.
मध्यंतरी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेल्या ‘निर्भया पथकाने’ या शाळेला भेट दिली होती. बारा वर्षांपासून सुरू असलेली ही चोख सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्हीचे व्यापक जाळे आणि शाळेतील शिस्त पाहून निर्भया पथकाने शाळेच्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक केले होते.
शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उभी केलेली ही भक्कम आणि दीर्घकालीन यंत्रणा पाहता, पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविल्यानंतर पूर्णपणे निर्धास्त राहत आहेत.
नवभारत इंग्लिश स्कूलने व गिरधरदास देवी विद्यालयाने गेल्या १२ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा पुढाकार पाहता, तालुक्यातील इतर शाळांनीही स्वतःहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यंत आवश्यक आहे. आता तालुक्यातील इतर शाळा या महत्त्वाच्या बाबतीत नेमकी कधी कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून, यासाठी शालेय व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन तालुक्यातील व शहरातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी आग्रही राहणे गरजेचे आहे, अशी मागणी पालक वर्गातून जोर धरत आहे.