“तक्रारींचा पाऊस, तरीही गढूळ पाणी सुरूच; अमळनेर पालिकेची निष्क्रियता चव्हाट्यावर!”
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील नागरिकांच्या नळांना अनेक दिवसांपासून गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि सोशल मीडियावरील संताप व्यक्त होऊनही पालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. कराच्या रूपाने लाखो रुपये वसूल करणाऱ्या पालिकेकडून मात्र नागरिकांना शुद्ध पाणी मिळणेही कठीण झाले आहे.

गढूळ पाणी पिण्यामुळे पोटाचे विकार, संसर्गजन्य आजार आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि जबाबदार विभागावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतापाची लाट उसळली असून, “जनतेचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?” असा संतप्त सवाल अमळनेरकर उपस्थित करत आहेत.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, तसेच या गंभीर निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे. अमळनेरकरांच्या संयमाची परीक्षा आता आणखी किती दिवस घेतली जाणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.