२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; राज्याच्या हरित अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
बारामती,प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

राज्य शासनाने सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यावर्षी पहिल्या टप्प्यात १८ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या हरित अभियानात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाची जनचळवळ उभी करावी, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
कन्हेरी येथे आयोजित कार्यक्रमात ‘स्व. मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान, बारामती’ तसेच ‘देवगिरी ते देवराई’ या राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाच्या नामफलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून शासन, उद्योग, सामाजिक संस्था आणि जनसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्र घडविता येईल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण संवर्धनासाठी दिलेली प्रेरणा व्यापक लोकचळवळीत रूपांतरित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
त्यांनी सांगितले की, ‘स्व. मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान’ हे केवळ पर्यटनस्थळ नसून पर्यावरण शिक्षण, निसर्ग संवर्धन आणि भावी पिढीला प्रेरणा देणारे केंद्र ठरेल. कन्हेरी येथील राखीव वनातील ५५ हेक्टर क्षेत्रात सुमारे ८ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीतून दोन टप्प्यांत विकासकामे सुरू असून, येथे सस्पेन्शन ब्रिज, सोलार पार्क, रॉक गार्डन आणि बटरफ्लाय गार्डन विकसित करण्यात आले आहे. या परिसरात देशी वृक्षांच्या लागवडीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘देवगिरी ते देवराई’ हे अभियान केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकासाची व्यापक चळवळ असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले. हवामान बदल, वाढते शहरीकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे वनसंपदेवर निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, विविध स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, सीएसआर भागीदार आणि स्वयंसेवक सहभागी झाले असून, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून राज्यात पर्यावरण संवर्धनाला नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनीही पर्यावरण संवर्धन ही लोकचळवळ बनविण्याची गरज अधोरेखित करत अभियानासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.