बारामतीत विकासाची नवी दिशा; आरोग्य,महिला सक्षमीकरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बारामतीत राज्यस्तरीय उपक्रमांचा शुभारंभ
२ हजार विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप व गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती मोहिमेला गती
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ समाजसेविका पद्मविभूषण सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालीवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी ‘गर्भाशयमुख कर्करोगमुक्त पुणे’ जनजागृती मोहिमेला राज्य शासन प्राधान्याने गती देत असल्याचे सांगितले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पात्र महिला कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहू नयेत आणि प्रत्येक मुलीला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात ‘आदिशक्ती’ आणि ‘टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक’ उपक्रमांतर्गत दोन हजार विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या २४० हून अधिक शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या, ८० हून अधिक स्टेम (STEM) प्रयोगशाळा, १० पीआय प्रयोगशाळा आणि शाळांमधील पाणी, स्वच्छता व शौचालय (WASH) सुविधा हस्तांतरित करण्यात आल्या.
महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांना जोडणारा ‘आदिशक्ती’ हा व्यापक उपक्रम असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी शासन, उद्योग, सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रितपणे समाजपरिवर्तनासाठी काम करण्याचे आवाहन केले.
सुधा मूर्ती यांनी महाराष्ट्राची समाजसुधारकांची परंपरा गौरवशाली असल्याचे सांगत मातृभाषेसह आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टेम प्रयोगशाळा आणि पायलट प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
खासदार स्वाती मालीवाल यांनी मुलींसाठी सायकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून शिक्षण, आत्मविश्वास, सुरक्षितता आणि स्वावलंबनाचे प्रतीक असल्याचे नमूद केले. देशभर अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘गर्भाशयमुख कर्करोगमुक्त पुणे’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ, MAATR ॲपचे उद्घाटन, ‘आशा गाथा’ गीताचे सादरीकरण, आशा व अंगणवाडी सेविकांना चष्मे, टॅब आणि ई-सायकलींचे प्रतीकात्मक वितरण तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय जिल्हा परिषद आणि विविध संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नासा, इस्रो व युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) शैक्षणिक भेटी, विद्यार्थी देवाण-घेवाण, ग्लोबल गुरुजी कार्यक्रम, बाल संसद आणि सौर विद्युतीकरण यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.