मेश्राम दांपत्य पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गैरहजर, सोशल मीडियावर मात्र पक्षाच्या नावाने सक्रिय; उमरेडमध्ये चर्चांना उधाण
रजत डेकाटे -प्रतिनिधी
उमरेड/ भिवापूर प्रतिनिधी : शिवसेना (शिंदे गट) पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर १३ जून २०२६ ला शनिवारी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे विविध स्तरांवर कार्यकर्ता व पक्षप्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महत्त्वाच्या पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात उमरेड विधानसभा क्षेत्राच्या महिला संघटिका इंजि. सपना मेश्राम आणि त्यांचे पती तथा शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र मेश्राम हे अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पक्षप्रवेश मेळाव्यात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून संघटनात्मक विषयांवर चर्चा केली.
या पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्याला माजी मंत्री शिवसेना नेते बच्चू कडू , आमदार कृपाल तुमाने, युवा सेनेचे नेते शुभम नवले, उपजिल्हाप्रमुख संदीप निंबार्ते, उमरेड विधानसभा सचिव दिलीप सोनटक्के यांची उपस्थिती होती.
नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाकडून राजेंद्र मेश्राम यांना उमेदवारी दिली होती मात्र ती उमेदवारी त्यांनी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाचे विधानसभा सचिव दिलीप सोनटक्के यांच्यावर त्यांनी शाब्दिक टीका सुद्धा केली होती.
मात्र, विधानसभा स्तरावर जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला संघटिका इंजि. सपना मेश्राम आणि त्यांचे पती राजेंद्र मेश्राम हे या कार्यक्रमात दिसून न आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे, प्रत्यक्ष कार्यक्रमात गैरहजर राहिल्यानंतरही सोशल मीडियावर मात्र दोघेही पक्षाच्या नावाने सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. विविध पोस्ट, संदेश आणि पक्षाशी संबंधित प्रचारात्मक मजकूर सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. “पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये उपस्थिती नोंदविण्यापेक्षा केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहणे पुरेसे आहे का?” असा सवाल काही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक स्तरावरील काही कार्यकर्त्यांच्या मते, संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रमांना उपस्थित राहणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि पक्षाच्या धोरणांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असते. त्यामुळे महत्त्वाच्या कार्यकर्ता मेळाव्यातील अनुपस्थितीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, मेश्राम दाम्पत्याच्या गैरहजेरीमागे नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही यावर अद्याप भाष्य केलेले नाही. मात्र, सोशल मीडियावरील सक्रियता आणि प्रत्यक्ष कार्यक्रमातील अनुपस्थिती यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.