बुद्ध विहाराच्या जागेवर सांडपाण्याचा निचरा; आरपीआय आठवले गटाचे शिरपूर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.
शिरपूर तालुक्यातील मौजे करवंद येथील बौद्ध वस्ती व नालंदा बुद्ध विहारासाठी दिलेल्या जागेवर जाणूनबुजून सांडपाणी सोडले जात असल्याच्या निषेधार्थ आरपीआय आठवले गटाने पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. 2004 साली ग्रामपंचायतीने गौतम बुद्ध सेवा मंडळ संचालित नालंदा बुद्ध विहारासाठी 14,700 चौरस फूट जागा मंजूर केली असतानाही, त्या जागेवर सांडपाण्याचे पाणी व घाण साचल्याने संपूर्ण परिसर दुर्गंधीने ग्रासला आहे. या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, बुद्ध विहाराच्या पवित्र जागेची जाणीवपूर्वक अवहेलना होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामसेवक व पंचायत समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आरपीआय आठवले गट आक्रमक झाला आहे. बुद्ध विहाराची जागा व बौद्ध वस्ती तत्काळ स्वच्छ करून दोषी ग्रामसेवकावर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. दिनांक 29 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या आमरण उपोषणात एकनाथ रामदास वाघ, विनोद छगन करंकाळ, नर्मदा ताई रघु भील, नरेश गवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले असून, या आंदोलनामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.