
खून प्रकरणाततील आरोपीस उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर.
मार्मिक न्यूज नेटवर्क :
लातूर जिल्ह्यातील गाजलेल्या सुखदेव रणसुळे खून प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा समोर आला आहे. माननीय उच्च न्यायालयाने आरोपी अजिंक्य वासरे यास जामीन मंजूर केला आहे. लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, सुखदेव रणसुळे याचा मृतदेह अजिंक्यतारा बॉईज हॉस्टेलसमोर, कॉईल नगर परिसरात आढळून आला होता. या घटनेनंतर सुखदेव रणसुळे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अजिंक्य वासरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, दोघांमध्ये झालेल्या वादातून रागाच्या भरात डोक्यात दगडाने मारहाण करून सुखदेव रणसुळे यांचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप होता.

या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी अजिंक्य वासरे यांना अटक केली होती. आरोपीने दाखल केलेला जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पूर्वी फेटाळून लावला होता. त्यानंतर वासरे यांनी आपल्या वतीने एडवोकेट निलेश भागवत यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने सादर केलेल्या युक्तिवादात असे नमूद करण्यात आले की, आरोपीला केवळ संशयाच्या आधारे अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही.

या सर्व बाबींचा विचार करून माननीय उच्च न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि आरोपी अजिंक्य वासरे यास जामीन मंजूर केला.

या प्रकरणात एडवोकेट निलेश भागवत यांनी मुख्य वकील म्हणून काम पाहिले असून, त्यांना एडवोकेट सुप्रिया बुधलकर, शुभम मोरे आणि आशिष वाघ यांनी सहकार्य केले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकरणाला नवा वळण मिळाले असून, पुढील सुनावणीत या खटल्यातील तपशीलवार पुराव्यांवर आता सर्वांचे लक्ष केंद्रीत होणार आहे.