अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त ईच्छापूर्ती गणपती मंदिरात ५६ भोग महानैवेद्य व सामूहिक महाआरती संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव
पानखिडकी परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजता ५६ भोगांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला तसेच शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत सामूहिक महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

१५० वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या या मंदिराची आख्यायिका ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी असून, भाविक आपली ईच्छा पूर्ण झाल्यावर मोतीचूर लाडूचा भोग अर्पण करतात. मातीच्या भिंतीच्या लहानशा मंदिरापासून ते भव्य आणि सुंदर मंदिरापर्यंतचा प्रवास असंख्य गणेशभक्तांच्या पुढाकाराने आणि जिर्णोद्धार कार्यातून साध्य झाला आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण वाडी संस्थानचे गादीपती प.पू. प्रसादजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले होते. अंगारकी निमित्त मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती, फुलांनी सजलेला गणेशमंदिर परिसर आणि प्रसाद वितरणामुळे वातावरण पवित्र व मंगलमय झाले. मंदिर समितीने दर्शन, महाआरती आणि प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेल्या सर्व भक्तांचे मनःपूर्वक आभार मानले.