इंदूर सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर, नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक – स्वच्छता सर्वेक्षण 2024
नवी दिल्ली | प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, मध्य प्रदेशमधील इंदूर शहराने सलग आठव्या वर्षी देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरण्याचा मान पटकावला आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातील नवी मुंबईने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनण्याचा मान मिळवला आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराने देखील लक्षणीय कामगिरी करत देशात सातवा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्रातील विटा आणि पाचगणी या लहान शहरांनी अनुक्रमे 20 हजार ते 50 हजार व 20 हजारांखालील लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरे ठरण्याचा मान मिळवला आहे.
मुंबईने देखील यंदा आपली कामगिरी सुधारली असून, मागील वर्षीच्या 37 व्या क्रमांकावरून यावर्षी 33 व्या स्थानावर झेप घेतली आहे. याशिवाय पनवेल महानगरपालिकेनेही चांगली कामगिरी करत केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात उल्लेखनीय स्थान मिळवले आहे.
राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राने एकूण 10 स्वच्छता पुरस्कार पटकावले असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील कार्यक्रमात देशभरातील 78 महापालिका आणि नगरपालिकांना गौरवण्यात आले.
लोकसंख्या आधारित गटांमध्येही उल्लेखनीय कामगिरी
3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात उत्तर प्रदेशातील नोएडाने पहिला, चंडीगडने दुसरा आणि कर्नाटकमधील म्हैसूरने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या सर्वेक्षणामुळे स्वच्छतेच्या चळवळीस अधिक गती मिळणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरतोय.