“तोंड ना’ उघडा, पण काम ना पक्का” – साहेबराव दादांचा नगरपालिका प्रशासनावर हल्लाबोल..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर नगरपालिकेच्या आर्थिक कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी नगरपालिकेच्या २०१६ ते २०२१ या पाच वर्षांच्या आणि २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या प्रशासकीय कालावधीतील आर्थिक कामकाजाची तुलना करत गंभीर आरोप केले आहेत.
पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रकाश टाकताना, त्यांनी स्पष्ट केले की लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या काळात पाण्याच्या आणि विजेच्या थकबाकीवर मोठ्या प्रमाणात भरपाई करण्यात आली, तर प्रशासकांच्या कार्यकाळात थकबाकीचा आकडा वेगाने वाढला आहे.
तथ्य काय सांगताया सत्य सांगा.
२०१६-२०२१ (लोकनियुक्त नगराध्यक्षांचा कार्यकाळ)
पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल नियमित भरणा – १४ कोटी ६५ लाख २० हजार २७० रुपये
पूर्वीच्या थकबाकीपैकी ५ कोटी ७३ लाख ८३ हजार २११ रुपये फेडले
एकूण भरलेली रक्कम – २० कोटी ३९ लाख ४३ हजार ४८१ रुपये
२०२२-२०२५ (प्रशासकांचा कार्यकाळ)
जळोद पाणीपुरवठा योजना थकबाकी – १५ कोटी ७३ लाख ५७ हजार ३३० रुपये
गांधली पंप हाऊस वीजबिल थकबाकी – १५ कोटी ०९ लाख ०६ हजार ३८० रुपये
कलाली डोह पाणीपुरवठा थकबाकी – १ कोटी ३१ लाख ६९ हजार ५७० रुपये
बिगर सिंचन पाणी पट्टी थकबाकी – ३ कोटी ९२ लाख ७५ हजार रुपये
पथदिवे वीजबिल थकबाकी – ८२ लाख १८ हजार ९३० रुपये
फक्त तीनच वर्षांत एकूण थकबाकी – ३६ कोटी ८९ लाख २७ हजार २१० रुपये
कामाचा प्रश्न, जबाबदारी कुणाची?
साहेबराव पाटील यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, “पाच वर्षांत आम्ही वीजबिल आणि पाणीपुरवठ्यासाठी २० कोटी रुपयांहून अधिक भरले, तर प्रशासकांच्या तीन वर्षांत थकबाकीचा आकडा तब्बल ३६ कोटींवर पोहोचला. हे नक्की कशाचे द्योतक आहे?”
“नागरिकांना आवाहन
नागरिकांनी या आकडेवारीचा अभ्यास करावा आणि वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, “कारभार कसा चालतो आणि जबाबदारी कोणाची आहे, हे जनतेला समजले पाहिजे. आम्ही आकडेवारीसह माहिती देत आहोत, प्रशासनाकडून उत्तर अपेक्षित आहे.”
पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष
या गंभीर आरोपांमुळे अमळनेर पालिका प्रशासन अडचणीत आले असून, नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासन यावर खुलासा करणार का, की हे आरोप तसेच अप्रमाणित राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.