June 29, 2025 2:56 am

खरं सांगा एकनाथराव बच्चू कडूंचा गेम कुणी केला ?

अपनी भाषा में पढ़े! Translate

खरं सांगा एकनाथराव बच्चू कडूंचा गेम कुणी केला ?

दत्तकुमार खंडागळे

राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा विधानसभेत पराभव झाला आणि सभागृहातला शेतक-यांचा बुलंद आवाज लुप्त झाला. आता इथून पुढची पाच वर्षे जनतेलाच नव्हे तर सभागृहालाही त्यांची पोकळी जाणवत राहिल. सभागृहाच्या भिंतीही त्या कणखर व बाणेदार आवाजाची आठवण काढत राहतील. विधानसभेत गेली वीस वर्षे शेतक-यांचा, अंध-अपंगांचा व जन-सामान्यांचा बुलंद आवाज म्हणून त्यांची तोफ धडाडत होती. सरकारवर ते तुटून पडत होते, लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत होेते. आजवरचे प्रत्येक अधिवेशन त्यांनी गाजवले. पण या वेळी विधानभेत त्यांच्या बुलंद आवाजाची उणीव भासताना दिसते आहे. विधानसभेत बच्चू कडू उभे राहिले की वाघाने डरकाळी फोडल्यासारखे तुटून पडायचे. सरकार कुणाचेही असो बच्चू कडू कडाडले की सरकारला घाम फुटत होता. मस्तवाल अधिका-यांना व प्रशासनाला धडकी भरत होती. शेतक-यांचे, अपंगांचे, वंचीतांचे प्रश्न अतिशय ताकदीने आणि प्रभावीपणे ते मांडत होते. आता अजून पाच वर्षे विधानसभेत हा आवाज घुमणार नाही. पुढच्या वेळी ते विधानसभेत पुन्हा निवडूण येतील. पुन्हा सभागृह गाजवतील. जन-सामान्यांसाठी त्यांच्याइतके त्वेषाने आता कोण कडाडणार नाही. सत्ताधा-यांच्यावर तुटून पडणार नाही, सत्तेला कुणी जाब विचारणार नाही याची खंत वाटते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा ठरवून गेम केला गेला. त्यांना जाणिवपुर्वक पाडण्यात आले. त्यांचा गेम का केला ? कुणी केला ? हे स्पष्ट आहे. आजवर जनताच माझी नेता आहे असं म्हणणा-या बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेना नेता मानले होते आणि फडणवीसांच्या शब्दांचे मोल सांभाळत एका कॉलवर गुवाहटीला जाऊन तथाकथित उठावात त्यांनी सहभाग घेतला होता. पण या बदल्यात या दोघांनी त्यांना काय दिले ? हा खरा प्रश्न आहे. या दोघांची हातापायासकट सगळीच्या सगळी बोटं सत्तेच्या तुपात बुडाली आणि बच्चू कडू फक्त बदनाम झाले. त्याना काय मिळाले तर अवहेलना आणि बदनामी.

एकनाथ शिंदेंच्या गुवाहटी कांडात सहभागी असणा-या प्रत्येकाचा फायदा झाला. सदरचे बंड प्रत्येकाच्या पथ्यावर पडले. अपवाद फक्त एकट्या बच्चू कडूंचा. या बंडाने त्यांना काय दिले ? हा चिंतनाचा विषय आहे. भानगडीत गुंतलेला एखादा ‘धन्या’ प्रेम प्रकरणात पोरगी पळवतो, त्याचा मित्र ‘गण्या’ त्याला पावलोपावली चिठ्या पुरवण्यासह साथ देतो. मन्या नावाचा तिसरा मित्र यात जास्त सहभागी नसतो. तो ऐनवेळी लग्नाला हजर होतो पण चिडलेले लोक ‘मन्या’ लाच बेदम ठोकून काढतात. बिचा-या ‘मन्या’ चा फारसा हात नसतो पण, “चला आहे मित्र करू आपणही मदत !” म्हणत ऐनवेळी सहभाग घेणा-या ‘ ‘मन्या’ वर सगळ्यांचा रोष निघतो. चिडलेले लोक त्याला फोडून काढतात. बेदम चोपतात, त्याचे घर पाडतात. तिकडे ‘धन्या’ पोरीला पळवून नेत गमजा करतो, संसार थाटतो, पोरंबाळं जन्माला घालतो, त्याचा साथिदार ‘गण्या’ ही नामानिराळा राहतो. ‘धन्या’ त्याला मदत करतो. पण या सगळ्या प्रकरणात बिच्चारा ‘मन्या’ फुकट मरतो. ‘धन्या’ त्याला मदत केली म्हणून काही देतही नाही. लग्नातली बुंदीपण गड्याच्या वाट्याला येत नाही. गुवाहटी कांडात बच्चू कडूंची अवस्था अगदी या ‘मन्या’ सारखीच झाली आहे. बाकीचे सगळे नामानिराळे राहिले. त्यांना सत्ता मिळाली, सत्तेची रसद मिळाली, मंत्रीपदं मिळाली पण सर्वात जास्त बदनामी वाट्याला आली ती फक्त बच्चू कडूंच्याच. तीस-चाळीस वर्षाच्या राजकारणात त्यांनी जे जपले ते धुळीला मिळाले. एकनाथ शिंदे ‘नायक’ झाले, फडणवीसांच्या हातात सत्ता आली, अनेकांना मंत्रीपदं मिळाली आणि बच्चू कडू ‘खलनायक’ ठरले. देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहटीला जाणा-या बच्चू कडूंच्या पदरात काय पडले ? हा संशोधनाधनाचा विषय आहे. बच्चू कडूंना लोकांचा विश्वास गमवावा लागला. स्वत:ची प्रतिमा धुळीस मिळवावी लागली. त्यांना या बदल्यात मिळाले काय तर दिव्यांग मंत्रालयाचा खुळखुळा. सदरचे मंत्रालय देण्याचे आश्वासन देत त्यांचे राजकारणच अपंग (दिव्यांग) करून टाकले गेेले. ना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले, ना त्यांना धडपणे ‘दिव्यांग मंत्रालय’ दिले. दिव्यांग मंत्रालयाला ना निधी, ना दालन, ना व्यवस्था. काहिच न देता फक्त दर्जा देऊन झुलवत ठेवले. ‘लग्न’ करून ‘बायको’ करणार नाही पण ‘बायकोचा’ दर्जा देतो, बायको सारखं ठेवतो अशी फसवणूक करणारा लबाड प्रियकर जसा ‘प्रियसी’ ला झुलवत ठेवतो तसे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना झुलवत ठेवले. या दोघांनी त्यांचा आवाज बोथट केला. त्यांचा बुलंद आवाज शांत केला. शेवटी विधानसभेतही त्यांचा ठरवून पराभव केला. विधानसभेच्या निवडणूकीत प्रचंड मताधिक्याने अनेक भणंग निवडूण आले. ज्यांचे नाव गांव व कामसुध्दा लोकांना माहित नव्हते असे गणंग नेटाने निवडूण आले पण बच्चू कडू पडले, हे कसं काय ? बच्चू कडूंचा ठरवून गेम केला गेला. बच्चू कडूंना एक नवखा माणूस पाडू शकतो ? ज्याचं फारसं काम नाही, योगदान नाही असा माणूस पाडू शकतो हे कसं काय ? एकनाथराव, खरं सांगा बच्चू कडूंचा गेम कोणी केला ? देवाभाऊ आणि तुम्ही दोघांनी मिळून केला की सर्वानी मिळून केला, नेमकं काय ? हे सत्य नसेल तर बच्चू कडूंना विधान परिषदेवर घेवून त्यांना दिव्यांग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री का करत नाहीत ? तुम्हाला बच्चू कडूंना संपवायचेच होते काय ?

आजवर चळवळीतले लढणारे सगळे नेते असेच संपवले गेले. सत्ताधा-यांनी या नेत्यांची अक्षरश: वाट लावली. राजू शेट्टी, सदाशिव खोत, महादेव जानकर वगैरे नेत्यांची आधीच वाट लावली होती. त्यात बच्चू कडू कसेबसे तग धरून होते पण त्यांचीही अखेर तीच अवस्था केली. सगळा दोष सत्तेचा व सत्ताधा-याचांच आहे असे अजिबात नाही. चळवळीतल्या या नेत्यांनीही चुका केल्या आहेत. सत्तासुंदरीने दाखवलेल्या ‘मांडी’ ला हे गडी भुलले आहेत. केवळ मांडीवरच यांची विकेट पडली आहे. बाकी काहीच यांच्या हाती लागले नाही. केवळ मांडी दर्शनावरच यांचा कार्यक्रम केला गेला. बच्चू कडू दिव्यांग मंत्रालयाचे कारण सांगत असले, गुवाहटी कांडाच्या निर्णयाचे समर्थन करत असले तरी त्यांचा निर्णय चुकला होता हेच खरे. त्यांनी सामान्य जनतेचा विश्वास तोडत अभद्र युती केली होती. त्यांनी असंगाशी संग केला होता आणि तोच त्यांच्या अंगलट आला हेच खरे आहे. उध्दव ठाकरेनी त्यांना मंत्रीपद दिले होते. मंत्री असताना त्यांना कोणतेही उठावदार काम करता आले नाही, ना स्वत:चा पक्ष वाढवता आला, ना स्वत:ची संघटणा ताकदीने बाधता आली. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी पक्ष-संघटणेकडेही गांभिर्याने लक्ष दिले नाही. त्यांना दाखवलेेले सत्तेचे खोटे स्वप्न त्यांचा घात करणारे ठरले. बच्चू कडू लबाडांच्या टोळीत घुसले. त्या आधी ते स्वतंत्र होते. त्यांचा कुणी नेता नव्हता. त्यांचे कुणी हायकमांड नव्हते. ते एकटेच होते पण वाघासारखे होते. एकटे बच्चू कडू म्हणजे अख्खा विरोधी पक्ष वाटायचे. त्यांनी सांगितले की मी देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलवर गुवाहटीला गेलो. तिथेच त्यांची प्रतिमा धुळीस मिळाली. बच्चू कडू सत्तेसाठी असे करतील, राज्याबाहेर पळून जातील असं सामान्य जनतेला अजिबात वाटत नव्हतं. लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. जनतेच्या सत्ताविरोधी प्रक्षोभाचे, असंतोषाचे ते अनभिषक्त नायक होते. शिंदे आणि फडणवीसांनी या नायकाचा पध्दतशीरपणे खलनायक केला.

या सगळ्या प्रकरणात बच्चू कडूंपेक्षा शेतक-यांचे, वंचीतांचे, अंध-अपंगांचे नुकसान जास्त झाले आहे. बच्चू कडूंचा पराभव हा त्यांचा एकट्याचा नाही. बच्चू कडूंचे आजवरचे काम पाहता असा माणूस पडणे हाच चांगूलपणाचा पराभव आहे पण तो झाला. बच्चू कडूंनी केलेले काम मैलाचा दगड ठरणारे आहे. त्यांची एक चुक त्यांना महागात पडली. “तेलही गेले आणि तुप ही गेले !” अशी त्यांची आज अवस्था आहे. बच्चू कडू म्हणजे कुणी नेता नव्हे तर सामान्य माणसाचा बुलंद आवाज होता, जो सभागृहात तोफेसारखा धडधडत होता. अजून वेळ गेली नाही, सर्व काही संपले नाही. बच्चू कडूंनी आत्मपरिक्षण करावे. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे. झालेल्या चुकीतून सावरावे. ( जर आपण चुकलो आहे असे वाटत असेल तर ) मायबाप जनतेची माफी मागून पुन्हा रणांगणात उतरावे. त्यांचासारखा योध्दा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा यश दुर पळत नाही. त्यांचा गेम ज्यांनी ज्यांनी केला त्यांचा गेम जनता केल्याशिवाय राहणार नाही पण बच्चू कडूंनी पुन्हा जनतेचा आवाज व्हायला हवे. पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरायला हवे. आज विरोधी पक्ष क्षिण झाले आहेत. त्यांचा आवाज दबला आहे. हिच बच्चू कडूंसाठी मोठी संधी असू शकते. बच्चू कडूंनी स्वत:चा पक्ष ताकदीने व गांभिर्याने बांधत हा आवाज बुलंद करत सरकारला दे माय धरणी ठाय करून सोडावे. त्यांच्यात ती क्षमता नक्कीच आहे.

दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!