करमाळा: काही वर्षांपूर्वीपर्यंत करमाळा शहराच्या आकाशात सायंकाळच्या वेळी पोपटांचे थवेच्या थवे पाहायला मिळायचे. विशेषतः किल्ला विभाग, ऐतिहासिक चिंचेची झाडे आणि जुन्या वाड्यांच्या परिसरात पोपटांचा किलबिलाट कानावर पडायचा. मात्र, दुर्दैवाने मागील काही वर्षांपासून करमाळ्यातून पोपट पूर्णपणे नाहीसे झाल्याचे चित्र दिसत आहे. निसर्गाच्या साखळीतील हा महत्त्वाचा घटक नेमका कुठे गेला, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे जेव्हा त्यांची लहान मुले म्हणतात बाबा आपल्या करमाळ्यात पोपट राहत नाहीत का?
पूर्वी करमाळ्यातील किल्ला परिसरात मोठी इंग्रजी चिंचेची आणि वडाची झाडे होती. ही झाडे तोडली गेल्याने पोपटांचा हक्काचा आसरा हिरावला गेला आहे. तसेच वाढत्या मोबाईल टॉवर्समुळे निघणाऱ्या लहरींचा लहान पक्ष्यांवर आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते आहे. शेतीमधील फळांवर होणाऱ्या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वाढत्या शहरीकरणामुळे आणि सिमेंटच्या जंगलामुळे तापमानात झालेली वाढ पोपटांना सहन होत नाही.

पोपट या पक्षाची काही वैशिष्ट्ये असून पोपट हा सरासरी २० ते ५० वर्षांपर्यंत जगू शकतो व माणसाची नक्कल करण्यात पटाईत असतो. तसेच तो स्वतःचे घरटे विणत नाहीत, तर झाडांच्या नैसर्गिक ढोलीत राहणे त्याला आवडते.
पोपट हा निसर्गाचा ‘खरा माळी’ म्हणून ओळखला जातो कारण पोपट फळे खाताना त्यांच्या बिया दूरवर नेऊन टाकतात. यामुळे दुर्गम भागातही नवीन झाडे उगवण्यास मदत होते. तसेच ते निसर्गातील कीड नियंत्रण आणि अन्नसाखळी टिकवून ठेवण्याचे काम करतो .

जर एखाद्या भागातून पक्षी अचानक नाहीसे होत असतील, तर तो पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचा स्पष्ट संकेत असतो.
त्यामुळे करमाळ्याचे सौंदर्य पुन्हा परत मिळवण्यासाठी आपल्याला स्थानिक झाडे म्हणजेच चिंच, पेरू, वड अशी देशी झाडे लावून त्यांचे जतन करावे लागेल. जर आपण आताच जागे झालो नाही, तर भविष्यातील पिढीला पोपट फक्त पुस्तकातच पाहायला मिळेल.