महाराष्ट्रात अमली पदार्थांचा वाढता सापळा; एनसीबीचा धक्कादायक अहवाल
मुंबई : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात तब्बल ५५ हजार किलो गांजा जप्त करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती अमली पदार्थ विरोधी पथक (NCB) ने आपल्या अहवालात दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गांज्याचा साठा उघड झाल्याने राज्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे किती भक्कम आहे, याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
याशिवाय, सिंथेटिक ड्रग्सच्या तस्करीत तब्बल सहा पटीने वाढ झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोकेन, मेफेड्रोन, एक्स्टसीसारख्या रसायनिक अमली पदार्थांचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे तरुण पिढी गंभीरपणे व्यसनाधीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.एनसीबीच्या मते, आंतरराष्ट्रीय रॅकेटशी जोडलेल्या काही मोठ्या टोळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र हा ड्रग्सचा हब बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलिसांसह केंद्रातील यंत्रणांनी अधिक कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी तस्करीला आळा घालणे ही मोठी वेळेची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.