“महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका – कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा व हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी”
अमळनेर : विक्की जाधव.
येथे महाविकास आघाडीच्या वतीने एक तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. संबंधित निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अवस्था ढासळलेली असून, विधानभवनात राडा, आमदारांचे गैरवर्तन आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांवर होणारे प्राणघातक हल्ले हे लोकशाहीला काळीमा फासणारे प्रकार आहेत. विशेषतः संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड व छावा संघटनेचे अध्यक्ष यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचे संकट, पावसाचा अभाव आणि वाढलेल्या शेतकी खते-बियाण्यांच्या किमती यामुळे अडचणीचा डोंगर उभा आहे. अशा गंभीर परिस्थितीत कृषिमंत्री विधानभवनात रमी खेळत असल्याच्या गंभीर आरोपासह, त्यांच्या शेतकऱ्यांशी असलेल्या बेपर्वा वर्तनाचा निषेध करण्यात आला. त्यांच्याकडून राजीनामा घेतला जावा, अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे.

तसेच, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील प्रशासन कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप करत, सामान्य जनतेसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी असा इशारा दिला आहे की जर शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर पुढील काळात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल.