अमळनेर- धुळे रस्त्यावर भीषण अपघात मनमिळाऊ रिक्षाचालक भटू पाटील यांचे दुर्दैवी निधन
अमळनेर : विक्की जाधव.
ताडेपुरा येथील तरुण रिक्षाचालक भटू दिलीप पाटील (वय २९) यांचे एका भीषण अपघातात जागीच निधन झाले. रविवार सकाळी लोंढवे येथे प्रवासी सोडून परतत असताना अमळनेरकडून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी (एमएच १८ एजे ५५८८) वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की भटू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. चारचाकी चालक अविनाश भैय्यासाहेब पाटील (रा. दहिवद) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४(४) तसेच मोटरवाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.
भटू पाटील यांचे आयुष्य संघर्षमय पण प्रेरणादायी होते. त्यांनी प्रेमविवाह केला होता आणि नुकतेच नवीन घर बांधण्याचे स्वप्न उराशी धरले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. अशा कठीण काळातही त्यांनी खंबीरपणे संसार सांभाळण्याचा प्रयत्न केला.
मित्रमंडळात अत्यंत मनमिळाऊ, हसतमुख आणि मदतीस तत्पर म्हणून ओळख असलेल्या भटूच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने नागरिक, मित्र व नातेवाईक उपस्थित राहिले.