June 29, 2025 3:02 am

अंबरनाथ विधान सभा निवडणूकीचे निष्पक्ष विश्लेषण पराभूत मानसिकतेमुळे दारूण पराभवाची नामुष्की !

अपनी भाषा में पढ़े! Translate

अंबरनाथ विधान सभा निवडणूकीचे निष्पक्ष विश्लेषण
पराभूत मानसिकतेमुळे दारूण पराभवाची नामुष्की !
अंबरनाथ विधान सभेच्या निवडणूकीत दोन शिवसेनेत चुरशीची लढत होण्याची शक्यता राजेश वानखेडे यांना उमेदवारी जाहिर होताच मावळली होती.डॉ.बालाजी किणीकर हे शिंदे गटाचे तिन वेळा विजयी झालेले आमदार असल्याने तुल्यबळ उमेदवार अपेक्षित असताना भाजपातून शिवसेनेत डेरेदाखल झालेले राजेश वानखेडे हे तुल्यबळ उमेदवार नव्हतेच. परंतू त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात शिंदे गटाच्या अंबरनाथ येथील दबंग नेत्याचा हात होता, हे गुपित राहिलेले नाही.
डॉ.बालाजी किणीकर हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत सामिल झालेल्या १६ आमदारांपैकी एक होते. त्यामुळे शिंदे सेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. कोणत्याही परिस्थितीत डॉ.किणीकर हे जिंकलेच पाहिजेत, याची व्यूहरचना ठाकरे गटाच्या काही नेत्यांशी संगनमत करून करण्यात आली होती, हे मी एक जबाबदार पत्रकार या भूमिकेतून सांगत आहे.
कल्याण विधान सभेत काय गोंधळ घाललायचा तो घाला ! परंतू अंबरनाथ विधानसभेत ढवळाढवळ करू नका ! असा सज्जड दम वजा संदेश वर्षावरून देण्यात आला होता. त्याचाच परिणाम म्हणून लोकसभा निवडणूकीत अंबरनाथ मतदार संघ परिसरात श्रीकांत शिंदे यांना ३० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्यच शिंदे गटाच्या पुढील विजयाची नांदी होती. या मनमानीमुळे ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक नाराज होऊन शिंदे गटात सामिल झाले होते. त्यांची मनधरणी करण्याचा वा प्रवेश रोखण्याचा प्रयत्नही झाला नाही. एकंदरीत लोकसभा निवडणूकीतच अंबरनाथ मतदार संघातील ठाकरे गट गलितगात्र झाला होता. विधानसभा निवडणूकीपुर्वीच अंबरनाथ विधानसभा मतदार संघ शिंदे गटाला आंदण दिल्यातच जमा होता.
या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी नगरसेवक व विधानसभेचे २०१४ चे माजी उमेदवार राजेश वानखेडे यांना पक्ष प्रवेश देऊन उमेदवारी बहाल करण्यात आली. २०१४ च्या निवडणूकीत वानखेडे हे अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झाले होते, याचे भांडवल करण्यात आले. मात्र त्यावेळी नरेंद्र मोदींची प्रचंड लाट होती व वानखेडे हे भाजपचे उमेदवार होते, ही बाब दुर्लक्षित करण्यात आली.मी सुरूवाती पासून लिहित आलो की, राजेश वानखेडे हे पराभूत मानसिकतेचे डमी उमेदवार आहेत.
२३ नोव्हेंबरच्या निकालावरून हे निष्पन्न झाले की, शिंदे सेनेचे व युतीचे उमेवार डॉ. बालाजी किणीकर यांना एकुण मतदानाच्या ६०.३२ टक्के इतके मतदान होऊन त्यांना १ लाख ११ हजार ३६८ मतं मिळाली.तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राजेश वानखेडे यांना मतदानाच्या ३२.५२ टक्के इतके मतदान होऊन त्यांना ५९ हजार ९९३ इतकी मतं मिळाली व त्यांचा ५१ हजार ३७५ मतांनी दारूण पराभव झाला. हा पराभव मला अनपेक्षित नव्हता. कारण वानखेडे यांनी जनसंपर्क करण्यात कमालीचा हलगर्जीपणा दाखवला होता. प्रचार यंत्रणेचे दुर्भिक्ष्य होते. मला कोणाची गरज नाही, मी जिंकणारच या घमेंडीत ते वावरत होते. उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतील प्रभागांत वानखेडे यांनी पाठ फिरवली. त्यांची मदार नेते व डॉ. किणीकर यांचे कट्टर विरोधक असलेल्या अंबरनाथच्या एका दबंग नेत्यावर व उल्हास नगरच्या एका युवा नेत्याच्या व दोन माजी नगरसेवकांवर होती, जे शिंदे गटाचे म्हणवतात. या गद्दारांनी गद्दाराला मदत करून शिंदेंशी गद्दारी करून गद्दारीचे वर्तुळ पूर्ण केले. एक सुषमा अंधारेंची सभा वगळता प्रचार सभाच झाली नाही, या उलट बोडारेंच्या कल्याण पुर्व मधे ३ जंगी सभा झाल्या.ते जिंकण्याच्या इर्शेने सर्वशक्तनिशी लढले ती लढाऊ वृत्ती वानखेडेच आढळली नाही. कार्यकर्ते जमवण्यात व ते टिकवण्याचे कसब वानखेडेत कधीच दिसले नाही. त्यामुळे हा डमी उमेदवार आहे, या दाव्याला बळ मिळत होते.
या उलट डॉ. बालाजी किणीकर यांची ही आमदारकीची चौथी निवडणूक असूनही ते अजिबात गाफिल नव्हते. पहाटे पाच पासून ते रात्री पर्यंत ते पायाला भिंगरी लावून ते फिरत होते. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले असो की मित्र पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्या ते सतत संपर्कात राहून निवडणूक यंत्रणा प्रभावीपणे राबवत होते. कुठेही माझा विजय पक्का आहे, हा फाजिल आत्मविश्वास नव्हता. त्यामानाने किणीकरांच्या १० टक्केही वानखेडेने प्रचार केला नाही.
EVM घोटाळा, लाडकी बहिण योजना व पैसे वाटप हे जरी गृहित धरले तरी किणीकर यांना ६० टक्के मिळतात व वानखेडे हे ३२ टक्क्यावर रेंगाळतात, यातच त्यांचे अपयश स्पष्ट होते.त्यांनी मनापासून व विजयाच्या इर्शेने प्रचार केला असता तरी त्यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होऊन ते २० हजार मतांनी जरी पराभूत झाले असते तरी ते आजच्या परिस्थितीत मान्य करता आले असते.त्यामुळे वानखेडे हे जिंकण्यासाठी नव्हे तर किणीकरांना जिंकून आणण्यासाठी लढले (?) असे खेदाने म्हणावेसे वाटते.
यापुर्वी साबीरभाई शेख हे लागोपाठ ३ वेळा याच मतदार संघातून विजयी झाले होते.१९९५ च्या निवडणूकीत साबीरभाईंना एकुण मतदानाच्या ५२.७९ टक्के मतं मिळून ते ५४ हजार ४८६ इतक्या मताधिक्याने विजयी झाले होते. डॉ. बालाजी किणीकर यांना यापुर्वीच्या निवडणूकीत २९ हजारापेक्षा जास्त मताधिक्य लाभले नव्हे.२००९ मधे त्यांना १९७७९ तर २०१४ मधे अवघे २०१४ मोदी लाटेत, तर २०१९ मधे २९२९४ इतके मताधिक्य लाभले होते. या निवडणूकीत त्यांनी विक्रमी ६०.३६ टक्के मतं घेतली.मात्र साबीरभाई शेख यांच्या ५४४८६ मताधिक्याचा विक्रम त्यांना मोडता आलेला नाही. तरी त्यांनी या मतदार संघातून चौथ्यांदा विजयी होण्याचा विक्रम प्रस्थापित केला. मी माझ्या निवडणूकपुर्व विश्लेषणात म्हटलेच होते की, डॉ. बालाजी किणीकर हे विजयी चौकार मारणार ! हे भाकित खरे ठरले.
निवडणूक म्हटली की हार जीत ही होतच असते. ती सन्मानजनक असावी अशी आपली अपेक्षा असते. पत्रकार या नात्याने मी निष्पक्ष विश्लेषण करीत असतो, तेव्हा पक्षनिष्ठेचा चष्मा बाजूला करून लिहावे लागते. मात्र एखाद्याच्या विरोधातील वस्तुस्थिती निष्पक्षपणे मांडणे याचा अर्थ मी एखाद्याच्या विरोधात आहे असे होत नाही,तसे कोणी समजूही नये.जर वानखेडे हे निवडून आले असते तर मी त्यांचेही तोंड भरून कौतुक केले असते. मात्र वस्तुस्थीती हीच आहे की ,
वानखेडे हे जिंकण्याच्या इर्षेने लढलेच नाही, त्यांची लढाई लुटूपुटूची होती, हे मात्र नक्की !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०
२५ नोव्हेंबर २०२४

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!