संजय राऊतच्या निष्ठेची नखाएवढीही सर या 52 गद्दारांना येणार नाही !
संजय राऊत तुझे सलाम !
संजय राऊत हे दैनिक सामनाचे सुमारे 30 वर्षे संपादक आहेत, राज्य सभेवर दोन टर्म खासदार असून तिस-यांदाही खासदार झाले. तसेच ते शिवसेनेचे डॅशिंग प्रवक्ते आहेत. एकाच माणसावर इतक्या जबाबदा-या व पदं मिळाल्याने उलटसुलट चर्चा होत होती. संजय राऊत व मिलिंद नार्वेकर हे मातोश्री व शिवसैनिक तसेच नेत्यांत अडसर निर्माण करीत होते,अशी सर्वसामान्य धारणा होती. वैयक्तिक माझेही संजय राऊत यांच्याशी मतभेद होते व त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप होते. परंतू संजय राऊत यांनी महाविकास आघाडी च्या स्थापने पासून अखेर पर्यंत जी एकाकी खिंड लढवली व शत्रूंना अंगावर घेऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली,त्यामुळे संजय राऊत यांच्या नेतृत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली.
एकीकडे नगरसेवक पदापासून खासदार,आमदार,कॅबिनेट मंत्री पद मिळालेले रोडपतीचे करोडोपती झालेले अस्तनितले निखारे शिवसेनेला सुरूंग लावण्याचे नापाक इरादे रचत होते, विरोधक टिकेची झोड उठवत असताना जे गद्दार बांधावर बसून मजा घेत होते,त्याचवेळी संजय राऊत सारखा योद्धा विरोधकांशी बाजीप्रभूंच्या इर्षेने शिवसेनेची खिंड लढवत होता.
त्याच वेळी हेच गद्दार पक्षप्रमुख मरण यातना भोगत असताना, आजारपणाशी लढत असताना कट कारस्थानं करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदच्युत करण्याच्या गनिमांच्या काव्यात सहभागी झाले होते. खोके मंत्रीपद,इडीची पीडा,आयटीची रेड व तुरूंगवास व जप्तीच्या ससेमि-यापासून वाचण्यासाठी गनिमांना शरण गेले,इतकेच नव्हे तर स्वाभिमान व निष्ठेची विष्ठा करीत गनिमांचे चरणदास झाले.
अशा प्रतिकूल परिस्थितीत एकच ढाण्या वाघ छातीची ढाल करून पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे रक्षण करीत होता,गनिमांचे वार स्वतःवर झेलत होता आणि ते रणछोडदास अनाजी व खंडोजी गनिमांचे तळवे चाटत होते, दिल्लीला वा-यामागून वा-या करून लाचारीने कुर्निसात करीत होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवसेनेच्या शत्रूंकडे गहाण ठेऊन मुख्यमंत्री पदाची जहागीरदारी मिळवण्यात धन्यता मानत होते. स्वराज्याशी द्रोह करणारे फितुर राजवैभव भोगत होते,तर संजय राऊत सारखा स्वामिनिष्ठ व निष्ठावंत मावळा स्वामी व स्वराज्य रक्षणासाठी आयुष्याचा होम करण्यास सज्ज झाला होता.
संजय राऊत यांनी मनात आणले असते व गद्दारांप्रमाणे निष्ठेची विष्ठा केली असती तर इडीच्या कारवाई पासून संरक्षण ( जसे एकनाथ शिंदे,प्रताप सरनाईक, भावना गवळी,यशवंत जाधव व यामिनी जाधव सारख्यांना मिळाले) मिळवून केंद्रात मंत्रीपद व 50 पेक्षा जास्त खोके घेऊन स्वतः चा बचाव करीत दहा पिढ्यांचा उद्धार करू शकले असते.त्यांच्यावर प्रचंड दबाव होता, आमिषं दाखवली जात होती.पण ते शिवधर्माला जागले, तुरूंगात गेलो तरी चालेल पण शरणागती पत्करून पक्ष व स्वामी द्रोह करणार नाही,असा निर्धार केला. आणि अपेक्षित तेच घडले. इमानावर,निष्ठेवर सत्तांध मुजोर वरचढ झाले. असत्याने सत्यावर मात केली.आणि संजय राऊत यांना इडिने अटक केली. त्यावेळी संजय राऊत यांचा आवेश अतुलनीय होता.हसत हसत ते तुरूंगात गेले.यालाच म्हणतात निष्ठा. पतीव्रतेच्या माथी धोंडा तर वारांगणेच्या गळ्यात मणीहार,अशी आजची परिस्थिती आहे. यावेळी, देख तेरे संसार की हालत क्या होगयी भगवान ! हे गाणं आठवतं.
याचसाठी संजय राऊत यांचे वेगळेपण अधोरेखित होते. 40+12 गद्दार हे परंप्रकाशित काजवे आहेत तर संजय राऊत हा अढळपद लाभलेला ध्रूव तारा भासतो. देशाच्या व महाराष्ट्राच्या इतिहासात संजय राऊत यांचे स्थान स्वराज्यातील हंबीरराव यांच्या सारखे नोंदवले गेले आहे तर या गद्दारांचे नांव पिढ्यानपिढ्या काळ्याकुट्ट अक्षरांत व कुचेष्टेने घेतले जाईल.
संजय राऊत तुमच्या निष्ठेला,
स्विभामानाला व त्यागी वृत्तीला सलाम ! आपण समस्त निष्ठावंतांसाठी दीपस्तंभ ठरला आहात. अभिमानाने मी आपणांस कडक जय महाराष्ट्र करतो.
दिलीप मालवणकर
9822902470