बोराडीत महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमुळे ग्रामपंचायतीची ‘दामिनी पथक’ नेमणुकीची मागणी
शिरपूर/- तालुक्यातील बोराडी गाव व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून महिला व शालेय विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बोराडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरपूर तसेच शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन तात्काळ ‘दामिनी पथक’ नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,गावातील मुख्य रस्ते, शाळा व महाविद्यालय परिसरात काही तरुण बिनधास्तपणे वावरत असून शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत.विनापरवाना दुचाकी चालवणे,कर्णकर्कश सायलेन्सरचा आवाज करून वेगाने वाहन चालवणे, यामुळे अपघातांचीही भीती निर्माण झाली आहे. परिणामी,मुलींमध्ये भीतीचे वातावरण असून शालेय शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर बोराडी व परिसरात तात्काळ ‘दामिनी पथक’ नियुक्त करावे,शाळा व महाविद्यालयीन वेळेत पोलिसांची विशेष गस्त वाढवावी, तसेच विनापरवाना व आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या ग्रामपंचायतीने केल्या आहेत. महिलांची सुरक्षितता व गावातील सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.